Raj Thackeray News: काही दिवसांपूर्वी मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याची एक वादग्रस्त घटना घडली होती. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर, मालाड येथील जैन समाजाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी आणि शिष्टमंडळाने आज मनसे अध्यक्ष माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांची त्यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी भेट घेतली. घडलेल्या प्रकाराबाबत जैन समाजाच्या वतीने मा.राजसाहेबांकडे लेखी माफीनामा सुपूर्द करण्यात आला. यावेळी राजसाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मान राखत, आपल्या खास शैलीत जैन समाजाच्या प्रतिनिधींना समज दिली.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईत सध्या ठिकठिकाणी दुकानांच्या पाट्या किंवा मराठी फलकांवर पांढरे पट्टे मारण्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे जैन आणि मराठी समाजात विनाकारण वाद निर्माण होत आहेत. हे वाद तातडीने थांबले पाहिजेत आणि मराठी अस्मितेचा आदर राखलाच गेला पाहिजे," अशा कडक शब्दात राजसाहेबांनी शिष्टमंडळाला सुनावले.
काय म्हणाले राज ठाकरे?
तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका. तुमचा वापर केला जातोय. डोकी भडकवली जात आहेत. तुमची भडकतील पण आमची भडकली तर ती केवढी भडकतील. तुमच्या सोसायटीत कोणी येणार असेल तर कारपेट टाका. पण पांढरे पट्टे मारुन काय सांगायचं आहे? विनाकारण वाद निर्माण करत आहेत. आत्ताच हे कसे सुरु झाले? व्यापारी आहात, व्यापार करा, शांतपणे जगा. आजपर्यंत तुम्हाला कधी त्रास दिलाय का? अशा शब्दात राज ठाकरेंनी खरडपट्टी केली.
जैन समाजाच्या प्रतिनिधींनी घडलेल्या घटनेबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली असून, कोणत्याही समाजाच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नव्हता, असे स्पष्ट केले. तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत आणि सामाजिक सलोखा राखला जाईल, अशी ग्वाही त्यांनी मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांना दिली. या भेटीनंतर मालाडमधील तो वाद आता शांततेने मिटल्याचे चित्र असून, मनसेकडून मराठी अस्मितेबाबतची भूमिका नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा ठामपणे मांडण्यात आली आहे.
(नक्की वाचा- VIDEO: भांडुप जंक्शनवर बाईक चालकांना का वाटतेय भीती? जीव मुठीत धरून नागरिकांचा प्रवास)