मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधु एकत्र येणार? अशी चर्चा सुरु झाली आहे. राज ठाकरे यांनी साद घातल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्रित येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही सर्वात मोठे विधान केले आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणालेत संदीप देशपांडे?
"उबाठा आणि मनसेची युती.. एवढ्याच संकुचित विचाराने याकडे पाहिले जाऊ नये. मराठी माणसाचे हीत, महाराष्ट्राचे हीत असे अनेक मुद्दे आहेत. परप्रांतीयांचे येणारे लोंढे, मराठीवरुन अरेरावी, अनेक उद्योग बाहेर जात आहेत या सर्व विषयांवर चर्चा झाली पाहिजे. फक्त निवडणूक एके निवडणूक, मी इतक्या जागा लढतो तु इतक्या जागा लढ.. अशी युती नको. महाराष्ट्र आणि मराठीच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यायलाच पाहिजे.." असं संदीप देशपांडे म्हणालेत.
तसेच "2017 मध्ये युतीच्या प्रोसेसमध्ये मी स्वतः होतो. त्या चर्चेमधला मी साक्षीदार आहे. त्यावेळी बाळा नांदगावकर साहेब स्वत: मातोश्रीवर गेले होते. मात्र उद्धव ठाकरे पहिल्या मजल्यावरुन तळमजल्यावर आले नाहीत. त्यामुळे बात निकलेगी तो दूर तक जायेगी. आता आज आम्ही हिंदीविरोधात आंदोलन करणार आहोत, त्यांनी त्यात सहभागी व्हावे," असंही संदीप देशपांडे म्हणालेत.
( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : आयपीएलचा इतिहास बदलला, 14 वर्षाच्या मुलानं केलं पदार्पण, पहिल्याच मॅचमध्ये खणखणीत सुरुवात )
त्याचबरोबर "हा महाराष्ट्रप्रेमी, हा महाराष्ट्रद्रोही याचे सर्टिफिकेट वाटण्याचे अधिकार शिवसेनेला नाहीत. भोंग्याच्या आंदोलनात आमच्या 17,000 मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले, त्यावेळी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होते. मग आता ती चूक उद्धव ठाकरेंना वाटते का? ते मनसैनिकांची माफी मागणार आहेत का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.