राकेश गुडेकर, प्रतिनिधी
Ratnagiri Airport latest News : कोकण आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याच्या दळणवळण,पर्यटन तसेच सागरी सुरक्षा क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आणि ऐतिहासिक पाऊल रविवारी पडणार आहे. रत्नागिरी विमानतळाच्या प्रत्यक्ष आणि वेगवान विकासासाठी भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) यांच्यात रविवारी जाहीर सामंजस्य करार (एमओयू)होणार आहे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. या ऐतिहासिक करारामुळे रत्नागिरीकरांचं विमान प्रवासाचं स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गातील मोठा अडथळा दूर होणार आहे.
स्थानिक पर्यटन आणि अर्थकारणाला मिळणार मोठी चालना
हा सोहळा रविवार 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता रत्नागिरी येथील टीआरपी परिसरातील 'हॉटेल सावंत पॅलेस हॉल'येथे आयोजित करण्यात आला आहे.रत्नागिरी विमानतळाच्या या सामंजस्य करारामुळे केवळ नागरी विमान वाहतुकीलाच गती मिळणार नाही,तर विस्तीर्ण कोकण किनारपट्टीच्या सुरक्षेला अधिक बळकटी येईल. त्याचबरोबर स्थानिक पर्यटन आणि अर्थकारणाला देखील मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला पालकमंत्री तसेच उद्योग व मराठी भाषा मंत्री मा.ना.डॉ.उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
नक्की वाचा >> मोठी बातमी! E-20 पेट्रोलच्या वापरामुळे वाहनधारकांचं होतंय नुकसान, केंद्र सरकारने दिली सर्वात महत्त्वाची अपडेट
त्यांच्यासोबतच गृह (शहरे), महसूल, ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री योगेश कदम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाला लोकसभा सदस्य नारायण राणे,सुनिल तटकरे, विधानपरिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, प्रमोद जठार, विधानसभा सदस्य शेखर निकम, भास्कर जाधव, किरण सामंत, प्रशासकीय अधिकारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, MADC दीपक कपूर, द कमांडिंग ऑफिसर कुणाल सी.नाईक, जिल्हाधिकारी मनुज जिंदल,मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे,पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हेदेखील उपस्थित राहणार आहेत.