प्रसाद पाटील, प्रतिनिधी
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात किंवा सुट्ट्यांच्या दिवसात ज्या महामार्गावर तासनतास अडकून पडावे लागते, त्या प्रवासातील सर्वात मोठे अडथळे आता दूर होणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या एका महत्त्वाच्या टप्प्याचे काम आता मार्गी लागत असून, यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. हा बदल नेमका कुठे होणार आहे आणि कधीपासून प्रवाशांना याचा लाभ मिळेल, याची सविस्तर माहिती आता समोर आली आहे.
काय आहे अपडेट?
रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि इंदापूर या दोन ठिकाणच्या बायपासचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून 1 जूनपर्यंत हे दोन्ही बायपास वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ही महत्त्वाची माहिती दिली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ही दोन शहरे वाहतूक कोंडीसाठी ओळखली जातात, मात्र आता या बायपासमुळे प्रवाशांची या त्रासातून कायमस्वरूपी सुटका होणार आहे.
( नक्की वाचा : Kalyan News: तुमची सोसायटी सुरक्षित आहे? कल्याणमध्ये घरकाम करणारे आणि फेरीवाले पोलिसांच्या रडारवर, कारण काय? )
माणगाव आणि इंदापूर या शहरांमधून महामार्ग जात असल्याने तिथे नेहमीच वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. विशेषतः पर्यटन हंगामात ही कोंडी प्रवाशांची सत्त्वपरीक्षा घेणारी ठरते. यावर उपाय म्हणून बायपासचे काम हाती घेण्यात आले होते, मात्र कोकण रेल्वेचा काही भाग या कामात आड येत असल्याने गती मंदावली होती.
रेल्वेचे विद्युत पोल आणि इतर तांत्रिक सुविधांमुळे कामात अडथळे निर्माण झाले होते. यासंदर्भात खासदार तटकरे यांनी कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, रेल्वे प्रशासनाने हे पोल आणि सुविधा तातडीने हलविण्याचे आश्वासन दिले आहे.
(नक्की वाचा : पुण्याची ती मुस्लीम तरुणी आणि आणि इंजिनिअर भावाचा क्रूर अवतार; बहिणीचा काटा काढत आईला दिलं 'सरप्राईज'! )
1 जूनपासून वेगवान प्रवास
या बैठकीनंतर बायपासच्या कामातील सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून आता कामाला वेग आला आहे. संबंधित यंत्रणांना कामाची गती वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व काही नियोजनानुसार झाल्यास 1 जूनपासून माणगाव आणि इंदापूर बायपासवरून वाहने धावू लागतील. हे दोन्ही बायपास सुरू झाल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास केवळ वेगवानच नाही, तर अधिक सुरक्षितही होणार आहे. स्थानिक नागरिकांसह कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.