Mumbai Goa Highway Bus Accident Update: मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी घाटात शुक्रवारी (ता. 3, एप्रिल) पहाटेच्या सुमारास एका खासगी बसला भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणारी ही बस उलटल्याने एका महिला वकिलासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. नागोठणे जवळील सुकेळी घाटातील चढणीवर हा अपघात झाला. याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून ब्रेक पॅडलखाली बॉटल अडकल्याने हा अपघात झाल्याचा दावा चालकाने केला आहे.
ब्रेक पॅडलखाली बॉटल अडकल्याने घडला भयंकर अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, 'ओमकार टुर्स अँड ट्रॅव्हल्स'ची ही बस मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होती. पहाटे पावणे तीनच्या सुमारास बस सुकेळी घाटात आली असता, चालक हेमंत पाटील (३३, रा. कणकवली) याने अतिवेगामुळे बसवरील ताबा गमावला आणि बस एका बाजूला पलटी झाली. या अपघातात पनवेल येथील रहिवासी असलेल्या नीलम विभुते (४०) आणि कामोठे येथील रहिवासी नईम शेख (३३) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नीलम विभुते या व्यवसायाने वकील होत्या.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातात बसमधील अनेक प्रवासी अडकून पडले होते. जखमींना तातडीने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र, रोहा उपजिल्हा रुग्णालय आणि कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या अपघातामुळे महामार्गावरील गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे दोन तास विस्कळीत झाली होती. नागोठणे पोलिसांनी बस चालकावर निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे.