मुंबई: मुंबई पुणे महामार्गावरुन एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. बुधवार (18 जून) सकाळी सुमारे 8.15 वाजता नवी मुंबई कंट्रोल रूमकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भाताळा बोगद्यानजीक मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठा साखळी अपघात झाला. या अपघातात मुंबईहून पुण्याकडे बांगलादेशी घुसखोरांना घेऊन निघालेल्या पोलीस ताफ्याच्या चार वाहनांचा एकमेकांना जोरदार धडक बसली. अपघातात तब्बल 20 हून अधिक पोलीस जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास किलोमीटर 16 येथे एक मोठा कंटेनर पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर आडवा झाला. त्यामुळे वाहतूक खोळंबली. एचएसपी पळस्पे आणि IRB कंपनीच्या हायड्रा यंत्रांच्या मदतीने कंटेनर हटवण्याचे काम सुरू असतानाच, एका आयशर टेम्पोने हायड्राला जोरदार धडक दिली. परिणामी एक लेन पूर्णपणे बंद झाली आणि केवळ दुसऱ्या लेनमधूनच वाहतूक सुरू होती.
वाहतूक अत्यंत संथ झाल्याने, किलोमीटर 10 वर पोहोचलेला पोलीस ताफा अडचणीत सापडला. एसटी महामंडळाच्या बसला पोलीस ताफ्यातील पहिल्या बसने पाठीमागून धडक दिली. त्यानंतर सलगपणे आणखी दोन पोलीस बस एकमेकांवर आदळल्या आणि अखेरीस एस्कॉर्ट करणारी स्कॉर्पिओ गाडीही धडकली. या साखळी अपघातामुळे बोगद्यात मोठा गोंधळ निर्माण झाला.
(नक्की वाचा- sonam Raghuvanshi: 'बेवफा'सोनम! एकदा नाही, दोनदा नाही, तर 'इतक्या' वेळा केला होता राजाला मारण्याचा प्रयत्न)
या अपघातात मुंबई शहर पोलीस दलातील 3 पीएसआय आणि 11 अंमलदार जखमी झाले असून, यापैकी पीएसआय विजय माने यांच्या दुखापतीची स्थिती गंभीर आहे. नवी मुंबई पोलीस दलातील ४ अंमलदार देखील किरकोळ जखमी झाले आहेत. याशिवाय बांगलादेशी घुसखोरांपैकी १२ जण यामध्ये 9 महिला, 1 बालक आणि 2पुरुष किरकोळ जखमी झाले आहेत. वैशाली पाटील (खांदेश्वर पोलीस ठाणे) ASI संतोष थिटे (खारघर पोलीस ठाणे) रोहिदास हगवणे (मुख्यालय) आशिष मोहिते, वाहन चालक अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
सर्व जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी आणि पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त चारही वाहने हायड्रा आणि क्रेनच्या सहाय्याने बोगद्यातून बाहेर काढण्यात आली. पोलीस आणि हायवे सुरक्षादलाने वाहतूक सुरळीत केली असून, सध्या रस्त्यावर वाहतुकीचा ओघ पूर्ववत सुरू आहे.
दरम्यान, या अपघातात जखमी झालेले बांगलादेशी नागरिक हे मुंबईहून पुण्याच्या दिशेने न्यायालयीन कारवाईसाठी नेत असलेल्या ताफ्यात होते. त्यांच्यावर अनधिकृत घुसखोरी आणि बेकायदेशीर वास्तव्याचे आरोप असून, त्यांच्यावरील पुढील कारवाईसाठी त्यांना न्यायालयात सादर केले जाणार होते.
(नक्की वाचा- Sonam Raghuvanshi: सोनमनं दिला राजाचा नरबळी? राजा रघुवंशी हत्या प्रकरणात तंत्र-मंत्रचा अँगल)