हवामान विभागाकडून रायगड आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याशिवाय कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यंदा मान्सून लवकर दाखल झाला आहे. पहिल्याच पावसात नागरिकांची धांदल उडाली आहे. मुंबई, ठाण्यातही सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे.
पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे. याशिवाय तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिराने धावत आहे. याशिवाय मुंबईतील ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईत कुर्ला, विद्याविहार, सायन, दादर, परेल या भागात सकाळपासून पाऊस सुरू आहे. हवामान खात्यानं मुंबईत पुढील काही तास मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईत पुढील काही तासांत सातत्याने पाऊस सुरू राहू शकतो. पावसाच्या तीव्रतेमुळे शहरातील खालच्या भागात पाणी साचण्याचं समोर आलं आहे. काल रात्री मुसळधार पावसामुळे काही क्षेत्रात पाणी साचलं आहे. त्यामुळे अत्यंत आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.
नक्की वाचा - Monsoon news: मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल,'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता
मध्यरात्री पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दादर माटुंगा परिसरात पाणी साचलेलं पहायला मिळतं आहे
वाहतुकीवर परिणाम...
मुंबईतील पूर्व द्रुतगती आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मुंबईतील पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. त्याचा फटका वाहतुकीचा बसत आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याच्या समस्येला दरवर्षी तोंड द्यावं लागतं. आजही काहीशी तशीच परिस्थिती आहे. त्याशिवाय मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या गाड्या 15 मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या जलद गाड्या 20 मिनिटांच्या विलंबाने धावत आहे. हार्बर लाईनवरही काही मिनिटांच्या विलंबाने रेल्वे सेवा सुरू आहे. दरम्यान, वेस्टर्न लाईनवर गाड्या 5 मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत.