Mumbai to Latur : देशभरात वंदे भारत एक्स्प्रेसचं जाळं तयार केलं जात आहे. सुसाट वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता लातूरकरांसाठी एक गुड न्यूज आहे.
लवकरच मुंबई-लातूर वंदे भारत एक्स्प्रेस (Mumbai Latur Vande Bharat Express) धावताना दिसणार आहे. मुंबई ते लातूर हा 525 किलोमीटरपर्यंत अंतर असून रस्ते मार्गाने साधारण 11 ते 12 तासांचा वेळ लागतो. एक्स्प्रेसनेही जवळपास 9.30 तास लागतात. मात्र वंदे भारत एक्स्प्रेसमुळे हेच अंतर 7 ते 7.30 तासांवर येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. ही एक्स्प्रेस सीएसएमटीवरुन सकाळी 6 वाजता निघेल आणि लातूरला दुपारी 1 ते 1.30 पर्यंत पोहोचेल.
कुठे असतील थांबे? l Mumbai Latur Vande Bharat Express Stops
CSMT
दादर
ठाणे
कल्याण
पुणे
कुर्डुवाडी
धाराशिव
लातूर
लातूरच्या ऐतिहासिक ठिकाणांना उजाळा..
मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा असलेल्या लातूरमध्ये ऐतिहासिक महत्त्व असलेली अनेक ठिकाणं आहेत. मात्र अनेकदा लातूर एक दुष्काळी जिल्हा म्हणून त्याकडे पाहिलं जातं. मुंबई ते लातूर वंदे भारत एक्स्प्रेसमुळे ऐतिहासिक ठिकाणांना उजाळा मिळू शकेल. लातूरमध्ये प्रसिद्ध सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर, अष्टविनायक मंदिर, सूरत शहवली दर्गा ही धार्मिक स्थळं आहे. याशिवाय लातूरमध्ये देशातील सर्वात मोठं सोयाबीन केंद्र आहे. मुंबई-लातूर वंदे भारत एक्स्प्रेसमुळे व्यवसाय वाढीला लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. शैक्षणिक बाबतीत सांगायचं झालं तर लातूर पॅटर्न हा सर्वश्रूत आहे. त्यामुळे लातूर हा जिल्हा मुंबईला जोडला गेला तर लातूर विकासात मोठा हातभार लागू शकतो.