अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी
Railway News : मुंबईहून विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर ते मुंबई दरम्यान आता एक नवीन रेल्वे (Ballarpur to Mumbai New Train) धावणार आहे. विशेष म्हणजे, ही नवी रेल्वे आता बल्लारपूर-मुंबई प्रवासासाठी आठवड्यातून दोनदा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.
विदर्भातून कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सध्या असलेल्या रेल्वेवर ताण आणि वेटिंग लिस्टची समस्या लक्षात घेऊन प्रवासी संघटनांनी नवीन गाडीची मागणी लावून धरली होती. रेल्वे बोर्डाने या मागणीला हिरवा कंदील दाखवला असून नव्या गाडीच्या वेळापत्रकाची घोषणाही केली आहे.
( नक्की वाचा : Dombivli News : ना भेट,ना बोलणं , थेट लॉजवर बोलावणं, डोंबिवलीच्या जावेदचा नातेवाईकांनी केला 'करेक्ट कार्यक्रम' )
काय आहे वेळापत्रक?
रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार, ही रेल्वे गुरुवारी रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथून सुटेल आणि शुक्रवारी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी बल्लारपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी शुक्रवारी सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी बल्लारपूरहून मुंबईकडे रवाना होईल.
( नक्की वाचा : Pune News: पुण्याचा मेट्रो नकाशा बदलणार! वनाज, कात्रज ते चाकण...नव्या लाईन आणि एकाच तिकीटाचा असा आहे प्लॅन )
या जिल्ह्यांना आणि शहरांना होणार फायदा
ही रेल्वे केवळ बल्लारपूर किंवा मुंबईपुरती मर्यादित नसून, महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणार आहे. या रेल्वेला नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा (अमरावती), धामणगाव, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट, वरोरा आणि चंद्रपूर असे थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील प्रवाशांनाही या नव्या सेवेचा मोठा लाभ मिळणार आहे.