Mumbai-Vijaydurg Ro-Ro Ferry: मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबई ते कोकणाचा प्रवास आता अधिक सोपा झाला आहे. लवकरच मुंबई ते विजयदुर्ग 'एम2एम प्रिन्सेस' रो-रो फेरी सेवा सुरू होणार आहे. या मार्गामुळे मुंबई ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अंतर ५ ते ६ तासांनी कमी होईल. महाराष्ट्र मॅरीटाइम बोर्डाकडून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे कोकणातील पर्यटनाला अधिक चालना मिळेल.
रो-रो सेवा कधीपासून सुरू होणार?
ऑगस्ट २०२५ मध्ये मुंबई ते विजयदुर्ग रो-रो फेरी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे याला उशीर झाला. आता सर्व अडचणी दूर करण्यात आल्या सून ही सेवा एका महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येईल. यासाठी कॉन्ट्रॅक्टर नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून निविदा जारी करण्यात आला आहे. हे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे. ही प्रायोगिक चाचणी यशस्वी झाल्यानंतर ही सेवा एप्रिल २०२६ पासून नियमित तत्वावर सुरू करण्याचे संकेत आहेत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात मुंबईकरांना कोकणात जाण्यासाठी समुद्राचा मार्ग उपलब्ध असेल. १ मार्चपासून ही सेवा सुरू होणार आहे.
आता किती वेळ लागतो?
मुंबई ते विजयदुर्ग रस्ते मार्गाने ४१२ किलोमीटर इतकं असून यासाठी ९ ते १० तास लागतात. मुंबईवरुन ट्रेनने सिंधुदुर्गात पोहोचण्यासाठी १० ते १२ तास लागतात. सुट्टी आणि सण-उत्सवाच्या काळात वेळ अधिक वाढतो. त्यातही रस्ते मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होते. समुद्रमार्गातून प्रवास केल्यामुळे प्रवाशांचा अर्ध्याहून अधिक वेळ वाचेल. त्यामुळे वाहतूक कोंडीशिवाय कोकणात जाण्यासाठी आरामदायी प्रवास करता येईल. ही सेवा भाऊच्या धक्क्यावरुन सुरू होईल. या रो-रो जेटीमधून प्रवासी दुचाकी आणि चारचाकी वाहन घेऊन जाऊ शकतात.
मार्च 2026 मधील फेरीच्या तारखा
मुंबई ते विजयदुर्ग: 1, 4, 7, 11, 14, 18, 21 आणि 25 मार्च.
विजयदुर्ग ते मुंबई: 2, 5, 8, 12, 15, 19, 22 आणि 26 मार्च.
मुंबई-विजयदुर्ग रो-रो प्रस्तावित दर?
इकॉनॉमी : 2,500 रु.
प्रिमीयम इकॉनॉमी : 4,000 रु.
बिझनेस क्लास : 7,500 रु.
फर्स्ट क्लास : 9,000 रु.
बाईक : 1,000 रु.
सायकल : 600 रु.
चारचाकी : 6,000 रु.
बस : 13,000 ते 21,000 रु.
प्रवासाचे वेळापत्रक आणि वेळ
प्रस्तुत वेळापत्रकानुसार, 'एम2एम प्रिन्सेस' ही फेरी मुंबईहून सकाळी 8 वाजता सुटेल आणि दुपारी 3 वाजता विजयदुर्गला पोहोचेल. परतीचा प्रवास विजयदुर्गहून दुपारी 12 वाजता सुरू होऊन सायंकाळी 7 वाजता मुंबईत संपेल. हा प्रवास साधारण 7 तासांचा असणार आहे.