Mumbra Local Accident: मुंब्रा लोकल ट्रेन दुर्घटना! CM फडणवीस, शरद पवारांची प्रतिक्रिया; मोठी मागणी केली

रेल्वेमार्फत सदर दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून लगेच समोर येईल, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनीही दुःख व्यक्त केले आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins

मुंबई: मुंबईमधून एक भीषण रेल्वे अपघाताची बातमी समोर आली असून मुंब्रा स्थानकाजवळ लोकल ट्रेनमधून पडून 4 जणांचा दुर्दैवी अंत झाला. मुंबई ते कर्जत आणि कसारा ते मुंबई  या दोन लोकल एकमेकांना घासल्याने दारात उभे असलेले प्रवासी खाली कोसळले. या दुर्घटनेनंतर हळहळ व्यक्त होत असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह मविआच्या नेत्यांनीही दुःख व्यक्त केले आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

CM फडणवीस यांची प्रतिक्रिया

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Advertisement

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

तसेच मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी झालेल्या भयंकर अपघातामुळे मी खूप व्यथित झालो आहे. ही अतिशय दुःखदायक घटना आहे. रोज सकाळी हजारो प्रवासी या मार्गावरून ये जा करतात. मी मृतांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. जखमींवर तातडीने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश ठाणे आणि कळवा येथील रुग्णालयांना दिले असून मी स्वतःदेखील डॉक्टरांशी बोललो आहे. रेल्वेमार्फत सदर दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून लगेच समोर येईल, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनीही दुःख व्यक्त केले आहे. 

Advertisement

Mumbra Railway Accident: मुंब्रा स्थानकातील तो जीवघेणा 'टर्निंग पॉईट', 5 जणांच्या मृत्यूला ठरला कारणीभूत?

शरद पवारांची प्रतिक्रिया

मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मध्य रेल्वेवर दररोज सरासरी ६ ते ७ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी याचं मुख्य कारण असल्याचं सर्वज्ञात आहे. तरीही, असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही. केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्वांच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे, असं शरद पवार म्हणालेत.

Advertisement

दरम्यान, काँग्रेसने या दुर्घटनेवरुन जोरदार टीका केली आहे.  रुळावरून घसरलेल्या ट्रीपल इंजिन सरकारमुळे मुंबईकरांचे रोज हाल! मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये आज झालेला भीषण अपघात अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारे आहे. मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लाखो प्रवाश्यांना रोज जीव मुठीत घेऊन लटकून प्रवास करावा लागतो. अश्याच ६ प्रवाशांचा आज अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईतील प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करता येत नाही, गर्दीच्या वेळी अधिकच्या ट्रेन सोडल्या जात नाही, तिथे अधिक लाईन टाकल्या जात नाही,ट्रेनला उशीर झाला की गर्दी अजून वाढत जाते अशा मुंबई लोकलच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी रेल्वेमंत्री फक्त रिल्स बनवण्यात व्यस्त असतात, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. 

Mumbra local Accident: दररोज 7 मृत्यू... मुंबई लोकलचा जीवघेणा प्रवास; 20 वर्षांची धक्कादायक आकडेवारी