Maharashtra Rajya Sabha Polls: शरद पवार पुन्हा एकदा दिल्लीच्या राजकारणात सक्रीय होण्यासाठी सज्ज झाले आहे त्यांच्या राज्यसभा उमेदवारीवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना आता पूर्णविराम मिळाला असून खुद्द काँग्रेस हायकामांडने पवारांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीचा धर्म पाळत काँग्रेसने आपल्या हक्काच्या जागेवर दावा सोडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
काँग्रेस हायकामांडचा मोठा निर्णय
राज्यातील राज्यसभेच्या जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने या जागेवर आमचा नैसर्गिक दावा असल्याचे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांनी दिल्लीतील वरिष्ठांशी आणि उद्धव ठाकरे यांच्याशी सातत्याने संपर्क साधला.
अखेर शरद पवार यांचे ज्येष्ठत्व आणि अनुभव लक्षात घेता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतः पुढाकार घेतला. खर्गे यांनी पवारांना पाठिंबा देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
( नक्की वाचा : Nitish Kumar : बिहारमध्ये 'नितीश' पर्वाचा शेवट? मुलासाठी सोडणार खुर्ची; वाचा काय आहे गेम चेंजर प्लॅन! )
मातोश्रीवर खलबतं आणि पार्थ पवारांची एन्ट्री
या संपूर्ण राजकीय घडामोडींदरम्यान शरद पवारांचे नातू रोहित पवार हे संध्याकाळी 7 वाजता उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत. या भेटीत महाविकास आघाडीच्या रणनीतीवर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, शरद पवारांप्रमाणेच त्यांचे नातू पार्थ पवार हे देखील उद् (गुरुवार 4 मार्च) राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं पार्थ यांच्या उमेदवारीची घोषणा यापूर्वीच केली होती. त्यामुळे पवार आजोबा आणि नातू एकत्र राज्यसभेत असणार आहेत. शरद पवारांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक आता बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.
( नक्की वाचा : Chhagan Bhujbal: 'मातोश्री' होणार होते तात्पुरते जेल! भुजबळांनी सांगितली बाळासाहेबांच्या अटकेची Inside Story )
भाजपचे सोशल इंजिनिअरिंग
दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने देखील आपल्या 4 उमेदवारांच्या नावांची घोषणा करून सामाजिक समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना उमेदवारी देऊन त्यांच्या संघटनात्मक कौशल्याचा सन्माम केला आहे. तसेच आरपीआय प्रमुख रामदास आठवले यांना पुन्हा एकदा आपल्या कोट्यातून संधी दिली आहे.
आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नागपूरच्या माजी महापौर माया ईवनाते आणि धनगर समाजाचे नेते रामराव वडकुते यांना संधी देऊन भाजपने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपली खेळी खेळली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा 1 उमेदवार देखील गुरुवारी अर्ज भरणार आहे.
निवडणुकीचे गणित आणि महत्त्वाच्या तारखा
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी ही निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 6 मार्च पर्यंत आहे. महाविकास आघाडीकडे असलेल्या संख्याबळानुसार त्यांना 1 जागा सहज मिळणे अपेक्षित आहे. येत्या 16 मार्च रोजी या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.