- नांदेडमधील नायगांव ग्रामीण रुग्णालयात विजपुरवठा खंडित झाल्यामुळे शवविच्छेदन वाहनाच्या उजेडात करावे लागले
- मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यासाठी पोलिसांनी पत्र दिले होते त्यानुसार हे शवविच्छेदन झाले
- विजेच्या तुटवड्यामुळे जनरेटर न चालल्याने शवविच्छेदन चालू ठेवण्यासाठी वाहनाच्या लाईटवर अवलंबून रहावा लागला
योगेश लाटकर
राज्यातील आरोग्या व्यवस्था कशी आहे हे दाखवून देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नांदेड इथं घडली आहे. नांदेडमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे असचं या घटनेनंतर बोलावं लागेल. नायगांव इथल्या ग्रामीण रुग्णालयातील पोस्टमार्टम विभागात वीजपुरवठा अचानक खंडीत झाला. ज्या वेळी हा विजपुरवठा खंडीत झाला त्यावेळी शवविच्छेदन सुरू होते. अशा वेळी एका खाजगी वाहनाच्या उजेडात पोस्टमार्टेम करण्यात आलं. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सरकारी रुग्णालयातील ही अनागोंदी गोरगरिबांना मनस्ताप देणारी ठरत आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनानेचे ही स्पष्टीकरण आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील नायगांव ग्रामीण रुग्णालयात एका मृतदेह आला होता. संध्याकाळी साडेसातची वेळ होती. नायगाव तालुक्यातील टेंभुर्णी येथील वडजे नावाचा एक 35 वर्षीय इसमाचा मृत झाला होता. मृत्यू नंतर पोलिसांनी मृताचे शवविच्छेदन करावे असे पत्र नायगाव ग्रामीण रुग्णालयाला दिले होते. हे पत्र मिळाल्यावर रुग्णालयात शवविच्छेदनाची तयारी करण्यात आली. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह शवागारात नेण्यात आला. यावेळी एक ॲम्ब्युलन्स तिथे उभी करण्यात आली होती.
या रुग्णावाहीकेच्या उजेडातच हे शवविच्छेदन सुरू करण्यात आले. शवविच्छेदन पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर ते तिथून निघून गेले. या घटनेचा फोटो समाजमाध्यावर व्हायरल झाला. वाहनाच्या उजेडात शवविच्छेदन अशी माहिती सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. रुग्णालये हे अत्यावश्यक सेवेत येतात. त्यामुळे इथं चोविस तास विज असणे अपेक्षित असते. लाईट गेली तरी जनरेटरची सुविधा सर्वत्र असते. असं असतानाही एका गाडीच्या लाईटवर शवविच्छेदन करण्याची वेळ येते हा गंभीर प्रकार होता.
याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके यांना संपर्क करण्यात आला. त्यांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावर शवविच्छेदन वाहनाच्या उजेडात करण्यात आल्याच्या घटनेला त्यांनी दुजोरा दिला आहे. शवविच्छेदन सुरू असतानाच तेथील विजेची वायर जळाली. अशा परिस्थितीत शवविच्छेदन थांबवता येत नसल्याने वाहनाच्या उजेडात उर्वरित बाबी पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेच्या चौकशीसाठी एक त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. यामध्ये स्थानिक रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून आला तर कारवाईचे संकेत देखील डॉ पेरके यांनी दिले आहेत.