निलेश वाघ, नाशिक:
Nashik Yeola Truck Fire News: नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या येवला येथील पिंपळगाव जलाल टोक नाक्यावर वाहतूक पोलीस आणि पंजाबच्या मालवाहू ट्रक मालकामध्ये मोठा राडा झाल्याचं समोर आले आहे. महामार्ग पोलिसांना पैसे न दिल्याने पोलिसांनी ट्रक जाळल्याचा गंभीर आरोप ट्रक ड्रायव्हरने केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ट्रकमध्ये आर्मी जवानाचे साहित्य असल्याचंही सांगण्यात येत असून याप्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पैसे न दिल्याने पोलिसांना ट्रक पेटवला, खळबळजनक प्रकार!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, येवला येथील पिंपळगाव जलाल टोल नाका येथे महामार्ग ( हायवे ट्रॅप ) पोलिसांनी मालवाहू ट्रक अडवली. दंड वसुलीच्या नावाने पाच हजार रुपयांची डिमांड केली. ती न दिल्याने पोलिस व ट्रक चालक यांच्यात वाद होऊन चालकाला मारहाण करत त्याचा मालवाहू ट्रक पेटवून दिल्याचा आरोप पंजाबमधील ट्रक मालकाने केला आहे..या घटनेनंतर येवला येथील अग्निशमन बंबाद्वारे आज विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले.
मात्र आग वाढतच गेल्याने गाडीतील बरेचसे सामान व गाडी जळून खाक झाली. घटनास्थळी स्थानिक नागरिक जमा झाल्याने पोलिसांनी तेथून पळ काढल्याचा आरोपही चालकाने केला आहे. पंजाबमधील या मालवाहू ट्रकमध्ये पुणे येथून आर्मी जवानाचे साहित्य भटिंडा येथे वाहतूक केली जात असल्याचे समजते. महामार्ग ( हायवे ट्रॅप ) पोलिस सातत्याने वाहनांना अडवून पैसे वसुली करत असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी देखील होत असल्याचा आरोपदेखील या चालकाने केला आहे..या घटनेची नेमकी सत्यता काय याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
ट्रक चालकाने काय सांगितलं?
सरदार सिंह याच्या आरोपानुसार, मी पुण्यावरुन पंजाब भटिंडा येथे जात होतो. माझ्या ट्रकमध्ये आर्मीच्या सीओडीचे साहित्य भरले होते. महामार्गावर चेकपोस्टवर आलेल्या पोलिसांनी गाडी अडवली. त्यांनी मला तु नो एन्ट्रीमध्ये गाडी घातली आहेस असं म्हणत दंड भरावा लागणार असल्याचे सांगितले. तुझ्या गाडीला 30,000 रुपयांचा दंड भरावा लागेल तु आम्हाला 5000 रुपये दे अशी मागणी त्यांनी केली. मात्र मी पैसे देण्यास नकार दिला.
यावेळी एक पोलीस कर्मचारी सिगारेट ओढत होता, त्याने माझ्या कानाखाली मारली. गाडीत गॅस होता, त्याच्या हातातील सिगारेटमुळे गाडीने पेट घेतला. गाडीतील सर्व साहित्य जळून खाक झाले. माझ्याकडे त्यांचा व्हिडिओही आहे. आग लागल्यानंतर हे पोलीस पळून गेले. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर ट्रक चालकांना लुटलं जाते, असा आरोप या ट्रक चालकाने केला आहे.
(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna: "...तर 'लाडकी बहीण' योजना बंद करा," हायकोर्टाने राज्य सरकारला झापले)