लग्नातील खर्च कमी करण्यासाठी मराठा समाजाचं मोठं पाऊल, आचारसंहिता निश्चित ! वाचा सर्व नियम

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

New Marriage Rule :  पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेचा हुंड्यासाठी छळ झाल्यानं मृत्यू झाला. या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. वैष्णवीप्रमाणेच राज्यातील अन्य भागातही झालेल्या हुंडाबळीचे प्रकरण पुन्हा उघड होत आहेत. लग्नात हुंडा प्रथा नष्ट करण्यासाठी आता सामाजिक संघटना पुढे येत आहेत.  पुण्यात मराठा समाजाची दुसरी बैठक पार पडली. या  विवाह सोहळ्यांमधील अनावश्यक खर्च आणि सामाजिक अडचणींवर सखोल चर्चा करण्यात आली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय झाली चर्चा?

या बैठकीत ही महत्त्वाच्या आचारसंहिता ठरविण्यात आल्या. त्यामध्ये हुंडा प्रथा पूर्णपणे बंद करणे, महिलांवरील छळास प्रतिबंध, विवाह सोहळ्यांतील साधेपणा व खर्च नियंत्रण या मुद्द्यांवर एकमताने निर्णय घेण्यात आला.

मराठासमाजाने हुंडा देणाऱ्या-घेणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विवाह सोहळा कमीत कमी पाहुण्यांमध्ये, वेळेवर आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यावर बैठकीमध्ये भर देण्यात आला.

कर्णकर्कश डीजे, फटाके, प्रि-वेडिंग शूटसारख्या गोष्टींना विरोध दर्शविण्यात आला असून, विवाहातील खर्च मुलगा व मुलीच्या दोन्ही कुटुंबांनी समान पद्धतीने वाटून घ्यावा असा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीत सामूहिक विवाहाला प्राधान्य देण्याचेही ठरवण्यात आले आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : मुलगा नाही, पैसे आण... सासरच्या त्रासाला कंटाळून 5 वर्षांच्या मुलीसह विवाहितेचं टोकाचं पाऊल! )
 

मराठा समाजाच्या बैठकीत लग्नासंबंधी ठरवण्यात आलेल्या आचारसंहितेमधील प्रमुख मुद्दे

  1. हुंडा देणार नाही आणि घेणार नाही.
  2.  ज्या कुटुंबामधे महिलांचा छळ होतो, हुंडा घेतला जातो त्या कुटूंबाशी रोटी- बेटी व्यवहार समाज करणार नाही. तसेच, ते कुटुंबं मराठा समाजातून बहिष्कृत केले जाईल.
  3.  ज्या महिलेचा सासरच्या माणसांकडून छळ होत असेल, त्या महिलेच्या माहेरची मंडळी मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. 
  4. कोणत्याही प्रकारचे ओंगळवाणे प्रदर्शन न मांडता विवाह सोहळे साधेपणाने आणि वेळेवर केले जातील.
  5. मानपानाचे सामाजिक प्रदर्शन केले जाणारं नाही. जावई मानासह सर्व मान कौटुंबिक स्वरूपात केले जातील.
  6.  मराठा समाज सामूहिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य देईल.
  7. विवाह सोहळ्यात एकच व्यक्ती आशीर्वादाचे स्वरूपातील भाषण देईल.
  8. विवाह सोहळा कमीत कमी पाहुण्यांमध्ये पार पडेल.
  9. विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळून, मुलगा-मुलगी यांचे नावे एफडी केली जाईल. तसेच, काही रक्कम गरजवंतांना मदत स्वरूपात केली जाईल.
  10. वरातीमधील कर्णकर्कश डीजेचा आवाज आणि त्यावरील विभत्स नृत्य बंद केले जातील. तसेच, प्रदूषण युक्त फटाके वाजवले जाणारं नाहीत.
  11.  प्री-वेडिंग शूट टाळले जातील.
  12.  विवाह सोहळ्याचा खर्च वर आणि वधू पक्षाने अर्धा-अर्धा करावा.

Topics mentioned in this article