New ST Bus Rules: एस.टी.ने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही ज्येष्ठ नागरिक, महिला किंवा विद्यार्थी असाल आणि एस.टी.च्या सवलतीचा फायदा घेत असाल, तर आता सावधान होण्याची वेळ आली आहे. कारण, आता केवळ ओळखपत्र दाखवून अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याचे दिवस संपले आहेत.
राज्य परिवहन महामंडळाने एक असा नियम लागू केला आहे, ज्यामुळे तुमच्या खिशात एक विशिष्ट कार्ड नसेल, तर तुम्हाला सवलत नाकारली जाऊ शकते आणि पूर्ण तिकीट काढूनच प्रवास करावा लागू शकतो. काय आहे हा नवा नियम आणि कोणते कार्ड तुमच्याकडे असणे अनिवार्य आहे, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सवलतीचा लाभ घेण्यासाठी डिजिटल कवच अनिवार्य
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावटगिरीला आळा घालण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC) प्रणाली बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती देताना स्पष्ट केले आहे की, यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ केवळ याच स्मार्ट कार्डद्वारे दिला जाईल. याचाच अर्थ असा की, जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल, तर तुम्ही सवलतीसाठी पात्र असूनही तुम्हाला पूर्ण दराने तिकीट खरेदी करावे लागेल. जुन्या पद्धतीच्या ओळखपत्रांवर आता सवलत मिळणे कठीण होणार आहे.
(नक्की वाचा : Pune News: पुणे स्टेशनवर आता नो गर्दी, नो गोंधळ, रेल्वे प्रशासनाचा मोठा 'गेम चेंजर' प्रकल्प! वाचा सविस्तर )
असे मिळवा तुमचे नवीन स्मार्ट कार्ड
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने कार्ड वितरणाची प्रक्रिया सोपी ठेवली आहे. नवीन मोबिलिटी कार्डची किंमत 199 रुपये (GST सह) निश्चित करण्यात आली आहे.
मात्र, ज्या प्रवाशांकडे महामंडळाचे जुने स्मार्ट कार्ड आधीपासून उपलब्ध आहे, त्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. असे प्रवासी जुने कार्ड जमा करून केवळ 149 रुपयांमध्ये नवीन हायटेक कार्ड मिळवू शकतात. हे कार्ड घेण्यासाठी लवकरच सर्व आगारांमध्ये विशेष नोंदणी मोहीम राबवण्यात येणार आहे, ज्यामध्ये विद्यार्थी, पत्रकार, दिव्यांग आणि महिलांना प्राधान्याने सहभागी करून घेतले जाईल.
( नक्की वाचा : Land Law Changes: जमीन आहे पण 'एनए' नाही? काळजी नको! सरकारने नियमात केलाय मोठा बदल, वाचा सविस्तर )
रिचार्जची सोय आणि वॉलेटची मर्यादा
हे कार्ड केवळ प्रवासासाठीच नाही, तर एका डिजिटल वॉलेटप्रमाणे काम करेल. कार्ड सक्रिय ठेवण्यासाठी त्यामध्ये किमान 100 रुपयांचा बॅलन्स असणे आवश्यक आहे. त्यानंतर गरजेनुसार 50 रुपयांच्या पटीत कितीही रिचार्ज करता येईल.
प्रवाशांना रिचार्जसाठी कुठेही लांब जाण्याची गरज पडणार नाही; बसमधील ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडे ही सुविधा उपलब्ध असेल. यामुळे प्रवासात सुट्या पैशांसाठी होणारी वादावादी आता कायमची थांबणार आहे.
ग्रामीण भागासाठी 3000 एजंटची फौज
डिजिटल क्रांतीचा हा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या प्रवाशापर्यंत पोहोचावा, यासाठी महामंडळाने मोठी तयारी केली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना नोंदणीसाठी त्रास होऊ नये म्हणून राज्यभरात 3000 हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. बसस्थानकांवरच ही सर्व प्रक्रिया पार पडणार आहे. मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्या सहकार्याने ही यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. त्यामुळे सवलत हवी असेल, तर आता वेळ न घालवता हे स्मार्ट कार्ड काढून घेणेच प्रवाशांच्या हिताचे ठरणार आहे.