Dombivli News साधारण दोन महिन्यांपूर्वी शुक्रवार, 4 जुलै रोजी कल्याण-शीळ मार्गावरील पलावा उड्डाणपुलाचं (Palava flyover) उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र पुलाचं उद्घाटन करताच काही वेळात पूल बंद करावा लागला. कारण पूल वाहतुकीसाठी खुला करताच त्यावरून कित्येक दुचाकी स्लिप झाल्या. पुलाला इतके खड्डे पडले की ते मोजणंही अवघड झाले. तब्बल 6 वर्षे या पुलाचं बांधकाम सुरू होतं. या काळात शीळ फाटा ते कटाईपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं होतं. मुंबई-नवी मुंबईहून डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरला जाणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र पूल सुरू होऊनही नागरिकांच्या अडचणी तशाच असल्याचं दिसून येत आहे.
दोन महिन्यात परिस्थितीत अधिक बिकट
पलावा ते निळजे, काटई चौकापर्यंत असलेल्या या पुलाला अवघे दोन महिने पूर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे सहा वर्षे या पुलाचं बांधकाम सुरू होतं. आणि अवघ्या दोन महिन्यात पुलावर केवळ खड्डेच खड्डे दिसत आहे. रस्ता जणू गायबच झाला आहे. त्यामुळे अनेक वाहनचालक पुलाऐवजी खालील सिग्नलच्या रस्त्याचा वापर करीत असताना दिसत आहे. विशेष म्हणजे या पुलावर अनेक ठिकाणी प्लास्टिकचा स्पि़ड ब्रेकर लावण्यात आला आहे. खड्डे असताना स्पिड ब्रेकर का लावले, असा सवाल येथील प्रवाशांकडून केला जात आहे.
दोन महिन्यात इतकी भीषण अवस्था?
250 कोटींचा खर्च करून वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी हा उड्डाणपूल बांधण्यात आला. यासाठी सहा वर्षांचा कालावधीही लागला. पूल सुरू झाल्यावर यावर भ्रष्टाचाराही आरोप करण्यात येत आहे. मनसे नेते राजू पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी या उड्डाणपुलावरील व्हिडिओ शेअर केला आहे.