सौरभ वाघमारे, सोलापूर
Panjabrao Dakh Weather Prediction : मे महिन्यांच्या अखेरीस पडलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. 1 जून नंतरचा पाऊस हा मान्सूनचा पाऊस असतो. मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ओलावा आहे. चांगले बियाणे आणि खत देऊन शेतीची मशागत करण्याचा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डंक यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिला आहे.
राज्यातल्या हवामान खात्याने 10 जून पर्यंत शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई करू नये, असा सल्ला दिला आहे. दुसरीकडे पंजाबराव डख यांनी एक इंच ओलावा असलेली जमिनी पेरणीसाठी पोषक असल्याचं सांगितलं आहे.
मुंबई-नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात पुढच्या दोन दिवसात हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल. 1 जून पासून ते 6 जूनपर्यंत सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणपट्ट्यात रिमझिम पाऊस पडणार आहे. मात्र 6 जूनपर्यंत जर जमिनीत वापसा असेल तर शेतीची कामे करून घ्यावी. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील, असा विश्वास पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.
मे महिन्यात झालेल्या अवकाळीत अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. घरांची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी विजा पडल्यामुळे शेतकरी दगावले आहेत. अशा ठिकाणी पंचनामे करणे आवश्यक आहे, असं पंजाबराव डख यांनी म्हटलं.
यंदा पूर्वेकडून मान्सून आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मग मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात चांगला पाऊस पडणार, असा अंदाज डख यांनी व्यक्त केला. दुष्काळी पट्ट्यातील जिल्ह्यांसाठीही यंदा आनंदाची बातमी असणार आहे. जूनमध्ये अनेक बंधारे भरून जातील, असाही अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केली.