नजीर खान
शनिवार असल्याने लाखो भाविक हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्याच वेळी एक अप्रिय घटना घडली आहे. ही घटना परभणी जिल्ह्यातील यशवाडी इथं घडली आहे. या ठिकाणी जागृत हनुमानाचं मंदिर आहे. त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यातून लाखो भाविक दर शनिवारी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात. या ठिकाणच्या मंदिराचे काम सुरू आहे. त्यानुसार मंदिराच्या सभा मंडपाचं ही काम केलं जात होतं. सर्व जण दर्शन घेत होते. त्याच वेळी मंदिरा समोरील सभामंडप अचानक कोसळला. त्या मंडपाच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले गेले आहेत. या घटनेनंतर एकच धावपळ आणि खळबळ उडाली आहे.
परभणीच्या पालकमंत्री मेधना बोर्डीकर यांनी ही दुर्घटना झाली असल्याचं सांगितलं आहे. त्या म्हणाल्या यशवाडी हे जागृत देवस्थान आहे. त्यामुळे शेजारच्या तिन-चार जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने भाविक दर शनिवारी इथं येतात. त्याच वेळी सभामंडप कोसळला आहे. त्यात अनेक जण ढिगाऱ्या खाली अडकले आहे. आतापर्यंत आठ ते दहा लोकांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अजून ढिगाऱ्या खाली किती जण आहेत हे सांगणे कठीण असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र यंत्रणा कामाला लागली असल्याचं त्या म्हणाल्या.
बचाव कार्य घटनास्थळी सुरू झाल्याचं ही त्या म्हणाल्या. पोलिस अधिक्षकांसह बडे अधिकारी घटनास्थळी रवाना झाल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या ठिकाणी दुर्घटना झाली तिथे जाण्याचा रस्ता छोटा आहे. शिवाय भाविक मोठ्या संख्येने असल्यांने त्यांनी आणलेल्या गाड्यांची संख्या ही जास्त आहेत. त्यामुळे घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडचणी येत आहेत. रस्ता तोकडा ही आहे असं ही त्या म्हणाल्या. या मंदिराच्या सभामंडपाचे छत कालच टाकण्यात आल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर ही दुर्घटना घडली आहे.
दरम्यान छता खाली आणखी वीस ते पंचवीस लोक अडकले असल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे. शिवाय आतापर्यंत तिन रुग्णवाहीका इथं आल्या होत्या. त्या भरून लोकांना परभणीला उपचारासाठी नेण्यात आल्याचंही प्रत्यक्षदर्शिने सांगितलं आहे. आणखी काही लोक ढिगाऱ्याखाली असू शकतील असं सांगितलं जात आहे. त्यामुळे सध्या तिथे बचाव कार्य सुरू आहे.