प्रदूषणामुळे ढग निर्मितीची प्रक्रिया बाधित, कोल्हापूर विद्यापीठातील प्राध्यापकाच्या संशोधनात चिंताजनक बाब समोर

सुमंता दंडापत यांनी देशातील 70 शहरांचा अभ्यास केला. या अभ्यासात त्यांनी ३० वर्षातील पावसाचं प्रमाण नोंदवलं.

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पुजारी, प्रतिनिधी

गेल्या काही वर्षात पावसाचं चक्र पूर्णपणे बदललंय. पण हे बदल नेमके कशामुळे होत आहेत?  तर वाढते शहरीकरण आणि प्रदूषणामुळे केवळ तापमानच वाढलं नाही. तर चक्क ढगनिर्मितीची नैसर्गिक प्रक्रियाच बाधित झाली आहे. हवेतील प्रदूषित कणांमुळे ढगांच्या रचनेत अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी पावसाचं एकूण प्रमाण कमालीचं घटल्याचं एका अभ्यासातून निदर्शनास आलं आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या शिवाजी विद्यापीठातील एका प्राध्यापकाला संशोधन करत असताना एक चिंतेची बाब समोर आली आहे.

कोल्हापूर विद्यापीठातील प्राध्यापकाच्या संशोधनातून चिंताजनक बाब समोर...

वाढतं शहरीकरण, उष्णता, प्रदूषण हे पावसाचं प्रमाण घटवण्यावर परिणाम करू शकतात असा या प्राध्यापकाचा अंदाज आहे. सुमंता दंडापत यांनी गेल्या 30 वर्षातील पावसाचा आढावा घेत संशोधन केलं. या संशोधनादरम्यान वर्षभरात पडणारा 51% पाऊस हा फक्त दोन महिन्यात पडताना दिसून येत आहे. उर्वरित काही दिवस पावसाचं प्रमाण कमी होत आहे. सुमंता दंडापत यांनी देशातील 70 शहरांचा अभ्यास केला. या अभ्यासात त्यांनी ३० वर्षातील पावसाचं प्रमाण नोंदवलं. नोंदणीवरून पावसाच्या प्रमाणात मोठे बदल जाणवलेत. गेल्या काही दिवसात वाढतं शहरीकरण आणि प्रदूषणामुळे फक्त तापमानचं वाढलं नाही. तर ढगनिर्मितीची नैसर्गिक प्रक्रियाच बाधित झाल्याचा अंदाज आहे. शहरी आणि ग्रामीण भागात पडणाऱ्या पावसाचं प्रमाण बदललंय. प्रत्येक शहरात पावसाचं सरासरी प्रमाण वेगळं आहे. वर्षभरात पडणारा पाऊस अवघ्या दोन महिन्यात बरसतोय. तापमान वाढीमुळे पावसाच्या प्रमाणातही बदल झाला आहे.

जगभरातल्या हवामानविषयक संस्थांनी ढग आणि पाऊस याबाबत अनेक निरीक्षणं नोंदवली आहेत. यानुसार पावसाचे थेंब लहान राहतात. प्रदूषणामुळे ढगात पाण्याचे थेंब खूप लहान बनतात. हे थेंब एकत्र येऊन जड होत नाहीत, त्यामुळे पाऊस पडत नाही किंवा उशिरा पडतो. ढग तयार होतात, पण पाऊस पडत नाही. अनेकदा आकाश ढगाळ दिसतं, पण प्रत्यक्षात पर्जन्य होत नाही. याला “ड्राय क्लाऊड्स” असंही म्हणतात. 

उष्णतेचा परिणाम  -  शहरांमध्ये प्रदूषण आणि काँक्रीटमुळे तापमान वाढतं. यामुळे वारे, आर्द्रता आणि ढगांची हालचाल बदलते. पावसाची पद्धत बिघडते. 

ग्लोबल वार्मिंगच्या चर्चा करत असताना येणाऱ्या काळामध्ये अनेक बदल दिसून येणार आहेत. आपण ग्लोबल वॉर्मिंगच्या चर्चा करत असतो. मात्र डोळ्यांना दिसणाऱ्या बदलांकडे सहज दुर्लक्ष करतो. 2025 ला झालेला पाऊस हा हवामान बदलाचा एक परिणाम असू शकतो असा अभ्यासकांचा अंदाज आहे. त्यामुळे वेळीच हवामान बदलाचा धोका ओळखून सावध पावलं उचलणं गरजेचं झालं आहे.

Advertisement