अजिंक्य धायगुडे पाटील: पुणे
Pune Palakhi Sohala 2026: आषाढी वारीचे वेध लागले असतानाच पुण्यामध्ये सध्या एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्यातील मुक्काम बदलण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. या निर्णयाला भवानी पेठेतील नागरिक आणि भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलीस आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत मुक्कामासाठी नवी ठिकाणे सुचवण्यात आली आहेत, मात्र त्याला स्थानिक नगरसेवकांनी कडाडून विरोध केला आहे.
Solapur News: जागा भाजपची तयारी शिवसेना शिंदे गटाची! हा पक्षप्रवेश शिंदेंसाठी 'गेमचेंजर' ठरणार?
माऊलींच्या पालखीच्या मुक्कामाचा वाद चिघळणार!
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा पुण्यातील मुक्कामावरुन सुरु झालेला वाद चिघळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. याचबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये माऊलींच्या पालखीसाठी नवीन मुक्कामासाठी पर्याय सुचवण्यात आले. शहरातील नेहरू स्टेडियम, सनस मैदान, एस पी कॉलेज या जागांचा यावेळी विचार करण्यात आला. मात्र या प्रस्तावाला कडाडून विरोध होत आहे.
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा भवानी पेठच्या विठोबा मंदिरामधील मुक्काम हलवू देणार नाही असा थेट इशारा स्थानिक नगरसेवक विशाल धनवडे यांनी दिला आहे. प्रसंगी आंदोलन करू, आडवे पडू मात्र पालखी भवानी पेठ येथेच मुक्काम करणार असा निर्धार नगरसेवक धनवडे यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे पालखी भवानी पेठेत असणे हा परंपरेचा भाग आहे, मात्र गर्दी जास्त होत असल्याने इतर पर्यायांचा विचार करावा लागेल असं पोलीस आयुक्तांचे म्हणणे आहे. याबाबत 13 एप्रिलला सारासार विचार करून पालखी सोहळा समिती निर्णय ठरवणार आहे.
दरम्यान, यावर्षी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 8 जुलै रोजी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यावर्षीचा पालखी सोहळा 18 दिवस चालणार असून त्यामध्ये 17 मुक्कामांचा समावेश आहे. या सोहळ्यामध्ये 4 गोल रिंगण आणि 3 उभे रिंगण पार पडणार आहेत. 25 जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे.