पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर (PunyaShlok Rajmata Ahilyadevi Holkar) यांना त्रिशताब्दी जयंती वर्षनिमित्त आहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये विशेष कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यावर आधारित बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती राज्य सरकार करणार असल्याची घोषणा केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्र्यांनी यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचं स्मरण करत त्यांनी देशभरात महाराष्ट्र धर्माची आणि हिंदू धर्माची पताका जागरुक ठेवण्याचं काम केलं असं सांगितलं. अहिल्यादेवी होळकर यांनी गुजरात मधील सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पण, त्याचवेळी हे मंदिर मूळ जागी न बांधता बाजूला का बांधलं? याचं कारण ही सांगितलं.
काय आहे कारण?
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की औरंगजेबानं सोरटी सोमनाथाचं मंदिर तोडलं. त्याची दहशत इतकी होती की एकाही राजाची नंतरच्या काळात ते मंदिर बांधण्याची हिंमत होत नव्हती. पण, अहिल्यादेवी यांनी ती दहशत न जुमानता त्या ठिकाणी जाऊन मंदिर बांधलं. पण, मंदिर बांधताना थोडं बाजूला बांधलं. त्यांना सर्व भारतीयांना दाखवायचं होतं, आता तरी शिका, एकत्र व्हा, तुमची मानकं तोडली जात आहेत. त्यांनी त्या मंदिराचे अवशेष तिथं जाणीवपूर्वक कायम ठेवले.
कारण, पुण्यश्लोक आहिल्यामातांना माहिती होतं की आमचा हिंदू हे अवशेष पाहणार नाही तोपर्यंत तो पेटून उठणार नाही. तो पेटून उठणार नाही तोपर्यंत त्याची मंदिरं अशीच तोडली जातील त्याच भावनेनं त्यांनी ते मंदिर तयार केलं. आज आहिल्या मातांना अपेक्षित असलेल्या मंदिराचा विकास आपल्याला पाहायला मिळतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यावर होणार बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती )
काशी विश्वनाथाच्या प्रांगणत अहिल्यादेवी पुतळा आम्ही पाहतो त्यावेळी आमचा ऊर भरुन येतो. आमच्या महराष्ट्राच्या कन्येनं महाराष्ट्र धर्माचं काम हिंदू धर्मा जागरुक ठेवण्याचं काम केलं, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
अहिल्यादेवी होळकर या नेहमी सांगत की, 'स्नान केल्यानं शरीर शुद्ध होतं, ध्यान केल्यानंतर मन शुद्ध होतं आणि दान केल्यानं धन शुद्ध होतं.' देशभरात त्यांनी मोठ्या प्रमाणात दानपुण्य केलं. त्यांनी देशभरात देवळं बांधली घाट बांधली. त्यामध्ये एकही पैसा राज्याच्या तिजोरीतून खर्च केला नाही तर स्वत:च्या पैशातून खर्च केले.
छत्रपती शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी म्हंटलं आहे कारण सर्व श्रीमंती असताना योग्यासारखे राहिलेले छत्रपती आपण पाहिले. तर अहिल्यादेवी होळकर देखील एवढं मोठं राज्य होतं, पैशाचा ओघ होता, पण अहिल्यादेवी एका छोट्याश्या घरात राहात होत्या. त्यांनी स्वत:साठी धनाचा वापर केला नाही. त्यामुळेच त्या पुण्यश्लोक झाल्या, लोकमता झाल्या. आपल्या प्रजेला मुलासारखं वागवलं, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
काशी, मुथुरा, जगनन्नाथ पुरी, अयोध्या, जेजूरी गया, पंढरपूर, नाशिक आपण म्हणाल तिथं अहिल्यादेवी निर्माण केलेलं वैभव आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी संपूर्ण माळव्याला दरोडेखरोपांसून मुक्त केलं. त्यांनी निष्पक्ष न्यायव्यवस्था उभी केली. त्यांनी तयार केलेली करपद्धती, कृषी पद्धती या सर्व प्रकारची आदर्श होती. अहिल्यादेवी राजवटीत त्यांनी हुंडाबंदी लागू केली. त्यांच्या राजवटीमध्ये कुणाचीही हुंडा घेण्याची हिंमत नव्हती, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.