बीड: बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता. या भयंकर हत्याकांडानंतर राज्यभरात निषेध मोर्चे, आंदोलने झाली. सरपंचाच्या हत्येने महाराष्ट्र हळहळत असतानाच त्यांची मुलगी वैभवी देशमुख बारावी परीक्षा देत होती. वैभवीचा बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून तिने 85.33 टक्के मार्क्स मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
नक्की वाचा - Rahul Gandhi News : राहुल गांधी भारतीय आहेत की ब्रिटीश? आज होणार फैसला
डोक्यावरील पितृछत्र हरवल्यानंतर वैभवी देशमुखसह तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आपल्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी आपले चुलते धनंजय देशमुख यांच्यासोबत वैभव महाराष्ट्रभर फिरत होती. नेत्यांच्या गाठीभाठी घेत त्यांना आपल्याला न्याय देण्याची विनंती करत होती. डिसेंबरमध्ये तिच्या वडिलांच्या हत्या झाली तेव्हापासून ती न्याय मागत होती. आंदोलन करत होती. या काळात तिचा नीटसा अभ्यासही झाला नाही.
अशाही परिस्थितीत तिने बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या परीक्षेत परीक्षेत वैभवी देशमुखला 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. यात इंग्रजी विषयात 63, मराठीत 83, गणितामध्ये 94, फिजिक्समध्ये 83, केमेस्ट्रीत 91 आणि बायोलॉजी विषयात 98 गुण मिळाले आहेत. तिला एकूण 600 पैकी 512 गुण मिळाले आहेत. या निकालानंतर तिने आपल्या वडिलांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले तसेच भावुक प्रतिक्रयाही दिली.
(नक्की वाचा- हळदही सुकली नव्हती... नवरदेवाने नवरीच्या मांडीवर जीव सोडला, मन सुन्न करणारी घटना!)
काय म्हणाली वैभवी देशमुख?
'मला एवढे मार्क अपेक्षित नव्हते. माझ्या वडिलांची ज्यापद्धतीने निर्घृण हत्या झाली त्याचे दुःख आम्हाला आहे कायम असेल. वडिलांच्या हत्येने त्यामुळे आमचे कुटुंबिय व्यथीत झाले होते. आज मला 85.33 टक्के मिळाले. आज खंत या गोष्टीची आहे की सर्वजण सोबत आहेत मात्र माझे वडील माझ्यासोबत नाहीत. त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडणार नाही. आजच नव्हेतर यापुढे कधीच पडणार नाही. आमचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे. ज्यांनी आमच्या वडिलांना मारले त्यांना लवकर फाशी द्यावी..' अशी मागणी यावेळी वैभवी देशमुखने दिले.
'माझी नीटची तयारी चालू होती. मात्र कालचा नीटचा पेपर झाला त्यामध्ये माझे स्कोरिंग खूपच कमी येत आहे. मला माझ्या वडिलांची स्वप्न पुर्ण करायची आहेत. आम्ही त्यावेळीच निर्णय घेऊ जेव्हा माझ्या वडिलांना न्याय मिळेल. त्यामुळे सरकारकडे विनंती आहे की आम्हाला लवकर न्याय द्यावा..', असेही वैभवी देशमुख म्हणाली.
(नक्की वाचा- UP News: अरेरे! 'तंदुरी रोटी'वरुन राडा, लग्नाच्या मंडपात 2 जणांचा जीव गेला)