स्वानंद पाटील, बीड: राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या गाजत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत मुंबईमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी वाल्मिक कराडला वाचवणाऱ्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडविरोधात रोष वाढत असतानाच बीडमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसध्या सीआयडी कोठडीत आहे. अशातच वाल्मिक कराडचे परळीतील जगमित्र हे कार्यालयाचे सूत्रे अजय मुंडे यांच्या हाती आली आहेत. याच कार्यालयातून वाल्मिक कराड नागरिकांचे प्रश्न सोडवत होता. वाल्मीक कराडच्या खुर्चीवर आता धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे बसत असून जगमित्र कार्यालयाची सूत्रे अजय मुंडे सांभाळत आहेत.
अजय मुंडे जिल्हा परिषदेचे सदस्य असून गटनेते देखील आहेत. पिंपरी जिल्हा परिषद गटातून ते विजयी झाले होते. तर धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत मतदारसंघात ते ऍक्टिव्ह होते. सध्या वाल्मीक कराड न्यायालयीन कोठडीत असताना जगमित्र कार्यालयाची सूत्रे कोण हाती घेणार हा प्रश्न होता. माञ अजय मुंडे यांनी या ठिकाणी कामाला सुरुवात केली आहे.
(नक्की वाचा- संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा पुरावा! वाल्मिक कराड आणि गँगचा धक्कादायक CCTV सापडला)
धनंजय मुंडे राज्याचे नेतृत्व करत असताना परळी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वाल्मीक कराड अग्रेसर होता. मात्र मागील दीड महिन्यांपासून जगमित्र कार्यालय ओस पडले होते. आता अखेर याच कार्यालयाची सूत्रे अजय मुंडेंकडे आली आहेत.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.एकीकडे खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणी वाढत असताना आणखी दणका कराडला बसण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडच्या मालकीची सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्याची मागणी करणारा अर्ज विशेष तपास पथकाने दाखल केला आहे.