- विविध संघटनांतील पैलवानांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या वादावर मोठा आक्रोश व्यक्त केला
- पैलवानांनी महाराष्ट्रात चार वेगवेगळ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा न घेता एकच स्पर्धा घेण्याची ठाम मागणी केली आहे
- महाराष्ट्र केसरी किताब विजेत्यांकडील मानाची गदा सरकारला परत करण्याचा इशारा पैलवानांनी दिला आहे
राहुल तपासे
महाराष्ट्रातील पैलवान आक्रमक झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील कराड येथे आज बुधवारी राज्यातील कुस्तीगीरांचा मोठा आक्रोश पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पैलवान कराडमध्ये एकत्र आले होते. यावेळी त्यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्या सरकार समोर मांडल्या. यासाठी 40 महाराष्ट्र केसरी, 12 हिंद केसरी अन् शेकडो पैलवान एकत्र आले होते. त्यांनी महाराष्ट्र केसरी ही एकच स्पर्धा असली पाहीजे ही प्रमुख मागणी लावून धरली आहे.
राज्यात सध्या चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतल्या जातात. या निर्णयाला कुस्तीपटूंचा विरोध आहे. या ऐवजी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी, अशी ठाम मागणी पैलवानांनी केली आहे. याच मागणीसाठी महाराष्ट्र केसरी किताब विजेत्यांकडील मानाची गदा सरकारला परत करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. ही गदा पैलवानांसाठी मानाची समजली जाते. तीच परत करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे सरकारपुढे ही पेच निर्माण होण्याची दाट शक्यत आहे. अशा वेळी आता चेंडू सरकारच्या कोर्टात आहे.
बुधवारी कराडमध्ये जवळपास 40 महाराष्ट्र केसरी, 10 ते 12 हिंदकेसरी आणि जवळपास शेकडो पैलवान एकत्र आले होते. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह अनेक दिग्गज पैलवान या आंदोलनात सहभागी झाले आहेत. ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या स्मारकाला अभिवादन करून पैलवान मुंबईतील आझाद मैदानावर सरकार दरबारी साकडं घालत उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हे आंदोलन चिखळण्याची ही शक्यता व्यक्त केली जात आहे. या पुढे माघार घेणार नाही असा इशारा चंद्रहार पाटील यांनी दिला आहे.
महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा मानाची समजली जाते. पण वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून या चार स्पर्धा सध्या महाराष्ट्रात होत आहे. या मुळे महाराष्ट्र केसरी या स्पर्धेच्या दर्जेवरच परिणाम होत आहे असा पैलवानांचा आरोप आहे. ही स्पर्धा मानाची आहे. त्यामुळे तिचा मान राखला गेलाच पाहीजे. त्यामुळे चार चार स्पर्धा घेण्या ऐवजी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली पाहीजे असं ही त्यांचे म्हणणे आहे. एकाच किताबाचे चार चार मानकरी त्यामुळे होतात असं ही काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे पुढे काय होतं हे आता पाहावं लागणार आहे.