Raj Thackeray News: शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा आज रायगडमध्ये होत आहे. या मेळाव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले. महाराष्ट्रात मराठीचा आणि भूमिपुत्रांचा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
काय म्हणाले राज ठाकरे?
"हल्लीचे आजार आणि सध्याचे महाराष्ट्राचे राजकारण काही वेगळं नाही. महाराष्ट्रात व्हायरल खूप फिरत आहेत. स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो शेतकरी कामगार पक्ष. ३ ऑगस्ट १९४७ ला स्थापना झाली अन् १५ ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. महाराष्ट्रातला स्वातंत्र्यपूर्व काळातला पक्ष... इतक्या वर्षानंतरही हे सर्व टिकून आहे आश्चर्य आहे," असं राज ठाकरे म्हणाले.
Maharashtra CM Devendra Fadnavis: मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार नेहरूंनी मांडला होता!
"भूमीपुत्रांचा विचार नाही..."
"आजचा प्रमुख रायगड जिल्ह्याचा मुद्दा सर्वांनी समजून घेतला पाहिजे. आज ज्या प्रकारे जेव्हा जेव्हा चांगले रस्ते आले आहेत आणि राज्यकर्त्यांचे लक्ष नसेल तर तो प्रदेश बरबाद व्हायला वेळ लागत नाही. आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राज्यातील मुलांना हिंदी कसे शिकवले जाईल याचा विचार करतोय. मात्र महाराष्ट्रातला मराठी माणूस, महाराष्ट्रातला भूमीपूत्र याचा काही विचार नाही. याचे विदारक चित्र म्हणजे रायगड जिल्हा असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
"जमिनी विकू नका..."
"आज पंतप्रधान मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले. डायमंड मार्केट गुजरातला गेले. प्रत्येक माणसाला राज्याबद्दल प्रेम असते मगं आम्ही बोललो की संकुचित कसे असतो. निवडणूका वगेरे येत राहतील. मात्र एकदा तुमची भाषा आणि जमीन गेली की जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलेही स्थान नाही. प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत आहे. माझी विनंती आहे की यापुढे जमिनीसाठी लोक आले तर जमीन विकू नका पण त्यांना म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तर आम्ही पार्टनर म्हणून येऊ," असं ठणकावून सांगा असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला.
"सध्या महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य संमेलन भरवत आहे. हे गुजराती बद्दलचे प्रेम नाही आहे हे मराठी माणसे आणि गुजरातीचे भांडण लागाव म्हणून सुरू आहे. यावर राज ठाकरे, संजय राऊत बोलतील असे वाटते, पण तुम्हाला जे हवे ते होणार नाही, पण तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागत असेल तर अंगावर येऊ, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.