मुंबई: आशिया कप स्पर्धेमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे. मात्र या सामन्याला भारतामधून विरोध होत आहे. पहलगाम हल्ल्यात निष्पाप भारतीयांचे जीव घेणाऱ्या पाकिस्तानसोबत मॅच नको, अशी भूमिका काही राजकीय पक्षांनी घेतली आहे. यावरुनच शिवसेना ठाकरे गटानेही आक्रमक भूमिका घेतली असून उद्या राज्यभर या सामन्याचा निषेध केला जाईल तसेच मोदींना हर घर से सिंदूर पाठवले जाईल, अशी घोषणा केली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
"पाकिस्तान आपल्यावर हल्ला करतो. पहलगाम हल्ल्यात धर्म विचारुन गोळ्या घातल्या गेल्या. मग भाजपच्या मते देशाची आणि हिंदूत्वाची काही किंमत आहे की नाही? एखाद्या सामन्यावर बंदी घातली म्हणून जागतिक संकट ओढवले असे होत नाही. आपले जवान शहीद होणार आणि आपण क्रिकेट खेळणार हे योग्य नाही. त्यामुळे आमचा या सामन्याला विरोध आहे.." असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर BCCI अध्यक्ष होणार? मास्टर ब्लास्टरच्या टीमनेच दिले स्पष्टीकरण
"या सामन्याचा उद्या शिवसेनेतर्फे राज्यभर निषेध केला जाईल. पहलगाम हल्ल्यानंतर दिलेल्या प्रत्यूत्तराला त्यांनी ऑपरेशन सिंदूर नाव दिले होते. भाजपकडून घर घर सिंदूरही पाठवले जाणार होते मात्र मोठा निषेध झाल्यानंतर त्यांना हे गुंडाळावे लागले. पण आम्ही आता पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर पाठवणार आहोत. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या राज्यभरात ठिकठिकाणी जमतील आणि पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर पाठवतील. नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आम्ही उद्या पोस्टाने कुंकू पाठवणार आहोत," अशी घोषणाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.
"सध्या देशभक्तीची थट्टाच नाही, देशभक्तीचा व्यापार चालवलाय. माझा प्रश्न आहे की पाकिस्तानसोबतचं युद्ध थांबवलंय का? अजुन एक संधी आहे की जे जगभरात शिष्टमंडळ पाठवून जमलेलं नाही, ते एका मॅचवर निर्बंध टाकुन तुम्हाला जमु शकते. तुम्ही जर निरज चोप्राला देशद्रोही म्हणणार असाल तर उद्या जय शाह तिकडे जाणार आहेत त्यांना देशद्रोही म्हणणार आहात का?" असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.