देवा राखुंडे, प्रतिनिधी
Sunetra Pawar on Ajit Pawar Death: अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत तुमच्या मनात ज्या शंका आहेत, त्या माझ्याही मनात आहेत आणि या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळालेच पाहिजे, असे जाहीर वक्तव्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या सांगता सभेत बोलताना त्यांनी या अपघाती मृत्यूबाबत प्रथमच मौन सोडले. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती देतानाच, यामागे काही चुकीचे आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
शंकांचे निरसन झालेच पाहिजे
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच त्यांच्या अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. यावर स्पष्टपणे भाष्य करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत शंकांचे निरसन होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाच्या सखोल आणि निष्पक्ष तपासाचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेचे सत्य जनतेसमोर आणण्यासाठी आपण कोणतीही तडजोड करणार नाही, असा शब्द त्यांनी यावेळी बारामतीकरांना दिला.
( नक्की वाचा : बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात 22 जणांची फौज; कुणाकडे 'बॅट' तर कुणाकडं 'प्रेशर कुकर', वाचा सर्वांची नावं )
दादांचे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी
गेल्या 35 वर्षांपासून अजित पवारांनी अफाट कष्ट करून बारामतीचा कायापालट केला आहे. दादा आता आपल्यात नाहीत हे कटू सत्य असले तरी, त्यांनी पाहिलेली स्वप्ने आपल्यालाच पूर्ण करायची आहेत. बारामतीला राज्याचे नंबर 1 चे मॉडेल बनवण्यासाठी दादांनी दिलेला विकासाचा वारसा मी खचून न जाता पुढे नेणार आहे, असा निर्धार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
'मी नातं टिकवायला आली आहे'
सभेत भावूक होत सुनेत्रा पवार म्हणाल्या की, माझे सर्वस्व हरपले असून दुःख मोठे आहे, मात्र जनतेच्या प्रेमामुळे मी हे शिवधनुष्य उचलले आहे. मी केवळ मते मागायला आली नसून दादांनी निर्माण केलेले नाते टिकवण्यासाठी तुमच्यासमोर उभी आहे. ज्या निष्ठेने येसूबाई लढल्या, त्याच निष्ठेने मी तुमची सेवा करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तुमचा विश्वास कधीही तुटू देणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
( नक्की वाचा : Pune News: हिंजवडीत नाशिक प्रकरणाची पुनरावृत्ती? IT कंपन्यांमधील 'त्या' धक्कादायक प्रकाराची थेट सरकारकडून दखल )
बारामतीची ही पोटनिवडणूक केवळ एका मतदारसंघाची निवडणूक नसून ती बारामतीकरांच्या अस्मितेची लढाई आहे. येत्या 23 एप्रिल रोजी होणारे मतदान हे दादांच्या प्रती असलेले तुमचे प्रेम आणि नाते सिद्ध करणारे असेल. त्यामुळे उन्हाळ्याची पर्वा न करता घराबाहेर पडा आणि दादांच्या विचारांना साथ देण्यासाठी घड्याळाला मतदान करा, असे आवाहन त्यांनी सांगता सभेत केले.