Sunetra Pawar Deputy CM Maharashtra : राज्याच्या राजकारणात आता एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेले उपमुख्यमंत्री पद आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सांभळणार आहेत. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची एकमतानं निवड झाली आहे. त्यानंतर त्या आता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान आता सुनेत्रा पवार यांना मिळणार आहे.
अर्थ मंत्रालय नाही
सुनेत्रा पवार जरी राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार असल्या, तरी अजित पवार यांच्याकडे असलेले सर्वात महत्त्वाचे आणि पॉवरफुल मानले जाणारे अर्थ व नियोजन मंत्रालय त्यांच्याकडे दिले जाणार नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्याकडे अर्थ, राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक विभाग होते. यापैकी केवळ अर्थ व नियोजन विभाग वगळता इतर सर्व खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली जातील. अर्थ मंत्रालयाची जबाबदारी आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळणार आहेत.
आगामी 2026-27 चा राज्य अर्थसंकल्प अजित पवार यांनी अत्यंत बारकाईने तयार केला होता. त्यांचे हे व्हिजन पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः या अर्थसंकल्पाच्या कामावर देखरेख ठेवणार आहेत.
( नक्की वाचा : Sunetra Pawar : पडद्यामागची ताकद आता पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; वाचा कसा आहे सुनेत्रा पवारांचा प्रवास )
मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?
नागपूर येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष म्हणून भाजप अजित पवार यांच्या कुटुंबीयांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.
फडणवीस म्हणाले की, उपमुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस जो काही निर्णय घेईल, त्याला सरकारचा पूर्ण पाठिंबा असेल. आम्ही अजित दादांच्या कुटुंबाच्या आणि त्यांच्या पक्षाच्या दुःखात सहभागी आहोत आणि त्यांना पूर्ण सहकार्य करणार आहोत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
( नक्की वाचा : KDMC Mayor Election : कल्याण डोंबिवलीचे कारभारी ठरले! मनसेच्या साथीनं महायुतीचे महापौर-उपमहापौर निश्चित )
सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास
सुनेत्रा पवार या 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सक्रिय राजकारणापासून काहीशा दूर होत्या. मात्र, 2024 मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून आपल्या नणंद सुप्रिया सुले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या प्रतिष्ठेच्या लढाईत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली. सध्या त्या राज्यसभा सदस्य आहेत.
आता राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे एक मोठी जबाबदारी सोपवली जात आहे. दरम्यान, या राजकीय बदलाबद्दल अनेक चर्चा सुरू असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचे भवितव्य काय असेल, असा प्रश्नही आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.