राकेश गुडेकर, रत्नागिरी:
Tapola Cable-Stayed Sky Bridge: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या 'तापोळा केबल स्टेड स्काय ब्रिज'चं काम अंतिम टप्प्यात आले असून ९०% काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे दुर्गम भागातील कांदाटी खोऱ्याला नवी संजीवनी मिळणार असून थेट महाबळेश्वर ते खेड प्रवास सुसाट आणि सुखकर होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' असलेला हा मार्ग दिवाळीतच वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
कांदाटी खोऱ्याला मिळणार नवी संजीवनी
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर कमी करणारी आणि दोन्ही विभागांना प्रगतीचा नवा महामार्ग दाखवणारी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याला थेट जोडणारा महत्त्वाकांक्षी 'तापोळा केबल स्टेड स्काय ब्रिज'चं काम अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे.
कोयना बॅकवॉटरवर उभारण्यात येणाऱ्या या भव्य पुलाचे तब्बल ९० टक्के काम पूर्ण झाले असून,हा पूल केवळ दळणवळण सुलभ करणार नाही, तर कांदाटी खोऱ्यातील निसर्गरम्य १५ ते १६ गावांच्या विकासाला नवी संजीवनी देणार आहे. मार्च २०२३ मध्ये सुरू झालेल्या १४८.५ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे ९०% काम पूर्ण झाले आहे.
महाबळेश्वर ते खेड प्रवास होणार सुसाट!
हा पूल म्हणजे राज्याचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' मानला जातोय.सध्या महाबळेश्वरहून कोकणात जाण्यासाठी आंबेनळी घाट किंवा वरंधा घाटाचा पर्याय आहे,मात्र हा नवा पूल सुरू झाल्यावर तापोळा मार्ग अधिक सोयीस्कर आणि निसर्गरम्य ठरणार आहे.विशेष म्हणजे,पूल अद्याप सुरू झाला नसतानाही त्याची एक झलक पाहण्यासाठी आतापासूनच पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
दरम्यान, या पुलामुळे खेड तालुक्याच्या आणि स्थानिक भागाच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे,असा विश्वास स्थानिक लोकप्रतिनिधी व्यक्त करत आहेत.. या पुलाचं काम जानेवारी २०२७ पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता असली,तरी ठेकेदारांनी दिवाळीपर्यंतच काम फत्ते करण्याचं ठरवलं आहे.