
अभिषेक भटपल्लीवार
एकीकडे महाराष्ट्रातील पट्टेदार वाघांची संख्या वाढत आहे. पण मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत असल्याचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. देशात मागील चार महिन्यांत 62 वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 20 वाघ हे केवळ एकट्या महाराष्ट्रातील आहेत. वाघांच्या मृत्यूत देशात महाराष्ट्र पहिला आहे. तर त्यानंतर सर्वाधिक वाघांचे मृत्यू हे मध्य प्रदेशात झाले आहेत. आकडेवारी नुसार 17 वाघांच्या मृत्यू मध्य प्रदेशमध्ये झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देशभरात 2022 च्या व्याघ्रगणनेनुसार देशात 3 हजार 167 वाघांची नोंद झालेली आहे. या व्याघ्रगणनेत महाराष्ट्राचाही वाटा मोठा होता. राज्यात 2018 मध्ये 312 वाघांची नोंद झाली होती. तर 2022 मध्ये त्यात मोठी वाढ होत, ती संख्या 444 वर पोहचली. पण व्याघ्र संवर्धनात आघाडी घेतलेल्या महाराष्ट्रात मात्र व्याघ्र मृत्यूची संख्याही मोठी आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. शिवाय मृत्यूची कारणे ही शोधली जात आहेत.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात गेल्या चार महिन्यांत देशात 62 व्याघ्रमृत्यू झालेले आहेत. हे मृत्यू वन्यजीवांच्या झुंजीत, अपघातात, शिकार वा नैसर्गिकरीत्या अशा विविध कारणांनी झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 20 वाघांचे मृत्यू झाले आहेत. बहेलिया आणि बावरिया यासह विविध टोळ्यांकडून मागील 5 वर्षात देशभरात तब्बल 100 हून जास्त वाघांच्या शिकारीच्या घटना घडल्या आहेत.
जी माहिती समोर आली आहे, त्यात 100 पेक्षा जास्त वाघांची शिकारी करण्यात आली आहे. शिकार करण्याच्या प्रमाणात दरवर्षी मोठी वाढ दिसून आली आहे. एक संघटित गुन्हेगारी 'सिंडिकेट' राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून वाघांचे अवयव भारतातील विविध भागात पुरवले जात असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. अशा टोळ्यांना शोधून त्यांचा पायबंद करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे, असं वन्य प्रेमींची मागणी आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world