राहुल वाघ, नाशिक:
Nashik News: निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर काळाने घाला घातला आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वैतरणा धरण परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि मृतांच्या गावावर शोककळा पसरली असून एनडीआरएफच्या (NDRF) मदतीने शोधकार्य राबवले जात आहे.
Jalgaon News : बिबट्यावरुन एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली; नेमकं काय आहे प्रकरण?
वैतरणा धरणात बुडून चौघांचा मृत्यू!
पहिली हृदयद्रावक घटना वैतरणा धरणालगत असलेल्या झारवड परिसरातील एका बेटावर घडली. येथे फिरायला आलेले आदित्य प्रमोद वानरे (वय २०, रा. नांदुरा, जि. बुलढाणा) आणि विरेंद्र नंदन पाटील (रा. पाचोरा, जि. जळगाव) हे दोघे तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. हे दोन्ही तरुण आपल्या मित्रांसोबत सुटीचा आनंद घेण्यासाठी येथे आले होते, मात्र या आनंदाचे रूपांतर काही क्षणातच दु:खात झाले.
दुसरी घटना वैतरणा धरणाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या दुगारवाडी वावी धबधब्यावर घडली. येथे सुनील गोसावी (वय २९, रा. गंगापूर, नाशिक) आणि मंगेश दिलीप चव्हाण (रा. चांदशी, नाशिक) हे दोघे मित्र पर्यटनासाठी आले होते. पाण्यात उतरल्यानंतर प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने एक जण वाहून जाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने शर्थीचे प्रयत्न केले, मात्र या प्रयत्नात दोघेही खोल पाण्यात ओढले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला.
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. सध्या एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बुडालेल्या तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी शोधमोहीम वेगाने सुरू आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच धरण क्षेत्रात अशा प्रकारे जीव गमवावा लागल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.