मुंबई: औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरुन नागपूरमध्ये हिंसाचार उफाळला. सोमवारी सायंकाळी दोन गटात झालेल्या राड्यामध्ये अनेक गाड्या, घरे पेटवण्यात आली तसेच तोडफोडही करण्यात आली. नागपूर शहरातील महाल, चिटणीस पार्क चौक, हंसापुरी, भालदारपुरा या भागात काही समाजकंटकांनी दगडफेक आणि जाळपोळ केली, यात पोलीस तसेच काही सामान्य नागरिक जखमी झाले. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. यावरुनच उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
"गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष करुन, मुघलांशी संघर्ष करुन निर्माण केलेल्या स्वराज्यावर चालून आला होता. तो महाराष्ट्र जिंकायला आला होता पण महाराष्ट्राच्या मातीतील एक कणही जिंकू शकला नाही. महाराष्ट्र जिंकायला आलेला औरंगजेबाला इथे मुठमाती दिली. अशा औरंगजेबाचे समर्थन कोणीही करणार नाही. त्यामुळे ज्याला कोणी त्याचे थडगे काढायचे असेल नुसते आंदोलन कशाला करता?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
"मुख्यमंत्र्यांनी औरंगजेबाची कबर उखडण्याचा असमर्थता दाखवली आहे. त्याला केंद्राचे संरक्षण आहे. मग केंद्र सरकार किंवा भाजपला विचारावं लागेल औरंबजेब तुमचा कोण लागतो? नागपूरमध्ये हिंदू खतरे में कसा काय? हा कट पूर्वनियोजित असेल तर गृहखाते झोपा काढत होते का? हा कट तुमच्या कानावर कसा आला नाही?" असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
"औरंगजेबाचे कोणीही शिवप्रेमी करु शकत नाही. मग मोदींकडे जाऊन त्याच्या कबरीचे संरक्षण हटवा. कोरटकर मोकाट सुटला, सोलापूरकर आहे. कोश्यारीही मजा करुन गेला. असं हे भाजपचे राजकारण आहे. हे अपयशी सरकार आहे, फसवेगिरी करुन सत्तेत आलेले आहे. शेतकऱ्यांच्या चिता जळत आहेत, तुम्ही कबरीचे राजकारण करता...' असा घणाघातही उद्धव ठाकरेंनी केला.