मनोज सातवी, वसई:
Vasai Virar Water Cut: वसई-विरार शहर महानगरपालिकेला होणाऱ्या सूर्या योजनेच्या पाणीपुरवठ्यावर तात्पुरता ब्रेक लागणार आहे. MMRDA मार्फत सुरू असलेल्या तांत्रिक कामांमुळे ४ एप्रिल ते १० एप्रिल २०२६ दरम्यान टप्प्याटप्प्याने २४ तासांचे शटडाउन घेण्यात येणार आहे. यामुळे शहराला मिळणाऱ्या सुमारे १५० दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता जाणवणार आहे. या कालावधीत संबंधित भागात कमी दाबाने पाणीपुरवठा किंवा पूर्ण बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करा आणि आवश्यक साठा करून ठेवा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
कुठे आणि कधी पाणी बंद राहणार?
- ४ एप्रिल – विरार पूर्व व पश्चिम
- ५ एप्रिल – नालासोपारा पूर्व व पश्चिम
- ६ एप्रिल – नवघर, वसई
- ७ एप्रिल – विरार पूर्व व पश्चिम
- ८ एप्रिल – नालासोपारा पूर्व व पश्चिम
- ९ एप्रिल – नवघर, वसई
- १० एप्रिल – विरार पश्चिम व नालासोपारा पश्चिम
पृथ्वीराज बी. पी. वसई-विरार महापालिकेचे नवे आयुक्त
दरम्यान, वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी. पी. यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. माजी आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या निवृत्तीनंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या आयुक्तांनी मूलभूत नागरी सुविधा सुधारणा, प्रशासनात पारदर्शकता आणि पर्यावरण संवर्धनावर विशेष भर देणार असल्याचे स्पष्ट केले.
तसेच शहराचा नियोजनबद्ध विकास करून वसई-विरारला ‘ग्रोथ हब' म्हणून विकसित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. महापौर अजीव पाटील तसेच उपमहापौर मार्शल लोपीस यांनी नवीन युक्त आयुक्तांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, दीपक सावंत व अन्य अधिकारी उपस्थित होते.