Washim Court News: वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) कारभारावर वाशिम जिल्हा न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. रस्ता विकासासाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला न दिल्याप्रकरणी न्यायालयाने तोंडगाव येथील टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा निकाल शेतकरी हितासाठी एक मोठा विजय मानला जात आहे.
कोर्टाचा दणका, थेट टोलनाका जप्तीचे आदेश
मिळालेल्या माहितीनुसार, बेबी गर्जे आणि विठ्ठल गर्जे या शेतकऱ्यांची अकृषक जमीन राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आली होती. मात्र, जमिनीचा मोबदला निश्चित करताना प्राधिकरणाने नियम धाब्यावर बसवले. यामध्ये रस्ते आणि खुल्या जागेचा मोबदला पूर्णपणे नाकारण्यात आला, तर प्लॉटचा मोबदलाही अत्यंत कमी आणि चुकीच्या दराने दिला गेला. सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतल्यानंतर त्यांनीही मोबदला वाढवून देण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्राधिकरणाने या आदेशांनाही केराची टोपली दाखवली.
अखेर कंटाळून गर्जे कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली. प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने कौल दिला. प्राधिकरणाने वाढीव मोबदला त्वरित देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. या दिरंगाईची गंभीर दखल घेत जिल्हा न्यायाधीशांनी आता थेट टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. वकील उदय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली असून, पैसे न भरल्यास प्रत्यक्ष जप्तीची कारवाई करण्यात येईल. प्रशासनाच्या या मनमानी कारभारावर आता अंकुश बसण्याची चिन्हे आहेत.