Miss India 2026 : भुवनेश्वर येथील किआइटी संकुलात ६१ व्या फेमिना मिस इंडिया २०२६ चा दिमाखदार सोहळा पार पडला. या सोहळ्यात गोव्याची साध्वी सतीश सैल ही मुख्य विजेती ठरली आहे. तर श्री अद्वैता जी द्वितीय उपविजेती ठरली आहे. तर पहिली उपविजेती राजनंदिनी पवार ठरली आहे. राजनंदिनी ही महाराष्ट्राची आहे. ती देशातील सर्वात सुंदर तरुणींपैकी एक ठरली आहे. तिच्या या यशामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राजनंदिनी पवार कोण आहे? l Who is Rajnandini Pawar?
राजनंदिनी पवार ही मूळची छत्रपती संभाजीनगरची आहे. तिथंच तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. तिचं मराठी भाषेवर प्रचंड प्रेम आहे. तिच्या कुटुंबाविषयी सांगायचं झालं तर तिचं तिच्या आजीसोबत घट्ट नातं होतं. राजनंदिनी ही तिच्या कुटुंबातील पहिली व्यक्ती आहे जी सौंदर्य स्पर्धेत सहभागी झाली. राजनंदिनी ही केवळ मॉडेल नसून एक उत्तम खेळाडू आणि कलाकारही आहे. ती राज्यस्तरीय नृत्यांगना, स्क्वॅश खेळाडू आणि विभाग स्तरावरील जलतरणपटू आहे.
राजनंदिनी तिच्या सकारात्मक विचारांसाठी आणि शांत स्वभावासाठी ओळखली जाते. जीवनातील प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्यावर तिचा विश्वास आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा तिला अभिमान आहे. या मातीची मुलगी म्हणून राज्याचे नाव हृदयावर मिरवणे ही माझ्यासाठी शब्दांत न मांडता येणारी भावना आहे, असं तिने स्पर्धेदरम्यान सांगितलं. या स्पर्धेने तिला अधिक आत्मविश्वासू आणि सशक्त बनवलं आहे. समाजावर सकारात्मक प्रभाव टाकण्याचा तिचा मानस आहे. राजनंदिनीच्या या यशामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, तिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
१७ एप्रिल २०२६ रोजी पार पडला सोहळा...
फेमिना मिस इंडिया २०२६ या स्पर्धेचा ग्रँड फिनाले १८ एप्रिल २०२६ रोजी पार पडला. या ६१ व्या स्पर्धेत देशभरातील ३० सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. यामध्ये गोव्याच्या साध्वी सतीश सैल हिने विजेतेपद पटकावलं, तर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजनंदिनी पवार हिने 'फर्स्ट रनर-अप' (प्रथम उपविजेती) हा मान मिळवला.