सागर कुलकर्णी, मुंबई: मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्याची भाषा करणाऱ्या मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याच नेतृत्वात मुंबईत भाजप सदस्य नोंदणी 50 टक्के सुद्धा टार्गेट पूर्ण करू शकली नाही मुंबईत भाजपाने सदस्य नोंदणीसाठी वीस लाख सदस्य नोंदणी करण्याचे ठरवले होते.मात्र आत्तापर्यंत फक्त दहा लाख इतकीच सदस्य नोंदणी झाली आहे. मुंबईत भाजपा पालिकेवर सत्ता मिळवण्याची स्वप्नं पाहते पण संघटनात्मक सदस्य नोंदणी उदासीनता का ? वाचा एनडीटीव्हीचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी केलेला खास रिपोर्ट.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आशिष शेलार विरुद्ध मंगलप्रभात लोढा वाद..
मुंबईमधील भाजपमध्ये सर्वात अंतर्गत राजकारणाचा विषय म्हणजे आशिष शेलार विरुद्ध मंगलप्रभात लोढा आणि राहल नार्वेकर विरुद्ध मंगलप्रभात लोढा. मंगलप्रभात लोढा यांना दक्षिण मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढवायची होती, त्याठिकाणी राहुल नार्वेकर यांच्या चर्चा होती. या दोघांच्या वादात तिसऱ्याचा फायदा झाला आणि ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेली.
अर्थात यामध्येही शिंदेच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. मुंबईमध्ये भाजपच्या अंतर्गत कलामुळेच ही जागा केली अशी चर्चा होते. आशिष शेलार, राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्यामधील कलहामुळेच मुंबईमध्ये कोणाला पालकमंत्री द्यायचे असाही प्रश्न होता. याच तिन्ही नेत्यांकडे आता सदस्य नोंदणीची जबाबदारी आहे. मात्र मुंबईमध्ये फक्त ५० टक्के सदस्य नोंदणी झाली आहे.
आशिष शेलारांची नाराजी..
प्रविण दरेकर, प्रसाद लाड, संजय उपाध्याय यांच्यासारखे मोठे नेते असतानाही सदस्य नोंदणीत उदासिनता का होते? असा सवाल आहे. स्वत:आशिष शेलार यांच्या मतदारसंघातच सदस्य नोंदणीची आशिष शेलार स्वत: सदस्य नोंदणीबाबत इतके उदासीन का आहेत? भविष्यात आपल्याकडे मुंबई अध्यक्षपद राहिल का? याबाबत त्यांना शंका आहे. ही आता मंत्रिमंडळात दिलेल्या खात्यावरुन ते नाराज असल्याचेही बोलले जात आहे.
महत्वाचं म्हणजे, सुनील राणे यांच्याकडे मुंबईमधील सदस्य नोंदणीची जबाबदारी देण्यात आली आहे, ते या मोहिमेत किती यशस्वी होतात यावरुन त्यांच्याकडे भविष्यात मुंबई भाजपची सूत्रे देण्याचा विचार होऊ शकतो. त्यामुळे राणेंना यशस्वी न होऊ देणे.. यासाठी ही सगळी खेळी सुरु आहे का? असाही सवाल उपस्थित होत आहे.
अंतर्गत कुरघोडी..
गेल्या दोन वर्षांपासून मुंबई पालिकेत प्रशासक आहेत. प्रशासकांच्या माध्यमांतून कामे सुरु आहेत. अशावेळेत भाजपच्या नगरसेवकांना फक्त संघटनात्मक कामे दिली जात आहेत. वेगवेगळी टार्गेट दिली जात आहेत. त्याव्यतिरिक्त त्यांना पक्षाकडून ताकद दिली जात नाही. किंवा स्थानिक नेतेही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. थोडक्यात अनेक दिग्गज नेत्यांची फौज असतानाही एकमेकांची जिरवण्याच्या नादात मुंबईमध्ये भाजप सदस्य नोंदणी होत नसल्याचे चित्र दिसत आहे.