बारामतीच्या राजकीय रणभूमीवर पवार घराण्याची ताकद पुन्हा एकदा चर्चेत आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यातील अंतर्गत तणाव चव्हाट्यावर आला आहे. 21 संचालकपदांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत. चार पॅनल्समधील हा तिरंगी सामना बारामतीच्या सहकारी आणि राजकीय वर्चस्वाची नवी चाचणी ठरताना दिसत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वत: उमेदवारी नोंदवत ‘निळकंठेश्वर' पॅनलच्या नेतृत्वाची धुरा हाती घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत कारखान्याने केलेली उत्तम कामगिरी, उच्च ऊसदर, फायदेशीर गाळप आणि AI तंत्रज्ञानाचा वापर हा त्यांचा प्रचाराचा केंद्रबिंदू आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केलं आहे. कारखाना नफ्यात आहे. शेतकरी आमच्याच पाठीशी आहे, असा आत्मविश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे. स्थानिक सहकार क्षेत्रात पकड ठेवण्यासाठी ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे.
ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash: आजी अन् नातीचं शव, 7 दिवसानंतर ओळख पटली, तो Video...
शरद पवारांचा बळीराजा सहकार बचाव पॅनल शेतकऱ्यांच्या भावनांना साद घालत आहे. ‘काका' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांनी आपल्या दशकानुदशकांच्या अनुभवाचा आणि ‘शेतकरी हित' या प्रतिमेचा आधार घेतला आहे. “सहकार हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे, तो जपण्यासाठी आमचा लढा आहे,” असं त्यांच्या पॅनलच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. शरद पवारांनी थेट उमेदवारी न नोंदवता पडद्याआडून रणनीती आखली आहे. त्यांचा प्रभाव अजूनही बारामतीत कायम असल्याचं दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील ताज्या फुटीमुळे ही निवडणूक केवळ कारखान्यापुरती राहिलेली नाही. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील ‘दादा-काका' युद्ध आता गावागावांत पोहोचलं आहे. अजित पवारांनी स्थानिक शेतकरी आणि सहकारी नेत्यांना एकत्र आणण्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. तर शरद पवारांचा पॅनल ‘पवार घराण्याचा खरा वारस' असल्याचा दावा करत आहे. दोन्ही गट बारामतीतील राजकीय वर्चस्वासाठी आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यात गुंतले आहेत.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीकडे आता केवळ बारामतीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागल आहे. ही निवडणूक अजित पवारांच्या नेतृत्वाची कसोटी आहे की शरद पवारांच्या अनुभवाचा विजय होईल? शेतकरी कोणाच्या पाठीशी उभा राहणार ‘निळकंठेश्वर' की ‘बळीराजा'? निकाल काहीही असो, बारामतीच्या राजकारणात यामुळे नवं वळण नक्की येणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.