सोमवारी अर्थमंत्री अजित पवार हे राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री म्हणून सादर करणार आहेत. नवीन महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर अर्थमंत्री म्हणून अजित पवारांचा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्पाकडे शेतकरी, उद्योजक, व्यापाऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मात्र या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सर्वाधिक वेळा अर्थ संकल्प कुणी सादर केला याची चर्चा सुरू झाली आहे. शिवाय त्यात अजित पवारांचा नंबर कितवा याची ही आता विचारणा होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार हे सोमवार 10 मार्च 2025 रोजी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे. अजित पवार हे आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक म्हणून ओळखले जातात. जनमताची नाडी ओळखून अर्थसंकल्पात लोकाभिमुख निर्णय जाहीर करताना राज्याच्या विकासप्रक्रियेला धक्का बसणार नाही याची काळजी ते घेत असतात, असं बोललं जातं. विकासयोजनांना निधी उपलब्ध करुन देण्यात तसेच पायाभूत विकासाची प्रक्रिया गतिमान ठेवण्यात ते सातत्याने यशस्वी ठरले आहेत. कोविडच्या संकटकाळात अनेक राज्यांची अर्थव्यवस्था अडचणीत असताना अजित पवार यांनी महाराष्ट्राची आर्थिक शिस्त बिघडू दिली नव्हती, त्याबद्दल त्यांच्या कार्याचा केंद्रीय पातळीवर गौरव झाला आहे.
शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित, आदिवासी, विद्यार्थी, युवक हे घटक त्यांच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. 2021 चा अर्थसंकल्प 8 मार्च जागतिक महिला दिनी जाहीर करताना त्यांनी तो राज्यातील महिला शक्तीला समर्पित केला होता. 2022 चा अर्थसंकल्प स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीदिनी 11 मार्च रोजी सादर केला होता. तो छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग, समर्पण, स्वराज्यनिष्ठेला समर्पित होता. कृषी, उद्योग, दळणवळण, आरोग्य, मनुष्यबळ विकास या पंचसूत्रीवर आधारीत अर्थसंकल्पही त्यांनी सादर केला आहे. मागील वर्षीचा निवडणूकपूर्व अर्थसंकल्प सर्वसमावेशक, क्रांतीकारी अर्थसंकल्प होता. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यात त्या अर्थसंकल्पातील लोकोपयोगी, लोकप्रिय निर्णयांचा महत्वाचा वाटा होता.
मात्र अजित पवारांचा हा अकरावा अर्थसंकल्प ठरणार आहे. पण त्यांच्या पेक्षा जास्त अर्थसंकल्प हे शेषराव वानखेडे यांनी अर्थमंत्री म्हणून मांडले आहेत. त्यांना आतापर्यंत 13 वेळा अर्थसंकल्प मांडले आहे. त्यांच्यानंतर अजित पवारांचा नंबर लागतो. अजित पवारांचा हा 11 वा अर्थसंकल्प असेल. त्यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान जयंत पाटील यांना मिळाला आहे. त्यांनी आतापर्यंत 10 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. तर सुशीलकुमार शिंदे यांनी तब्बल 9 वेळा अर्थ संकल्प मांडला आहे. वानखेडे यांचे रेकॉर्ड मोडण्याची संधी अजित पवारांकडे आहे.