- मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख पराभूत
- निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा मोठ्या फरकाने विजय झाला
- निवडणुकीनंतर संतोष देशमुख यांच्या आईला स्वरूपानंद भेटले
आकाश सावंत
केज तालुक्यातील मसाजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक राजकीय संघर्षापेक्षा भावनिक संघर्षाची ठरली आहे. माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या या जागेवर निवडणूक पार पडली. या निवडणुकीत संतोष देशमुख यांची पत्नी निवडणूक रिंगणात होती. तर त्यांच्या विरोधात स्वरूपानंद देशमुख उभे होते. या निवडणुकीचा निकाल आज लागला. हा निकाल धक्कादायक होता. कारण या निवडणुकीत संतोष देशमुखांच्या पत्नीचा मोठ्या फरकाने विजय झाला. त्या स्वरूपानंद देशमुख हे विजयी झाले. या विजयानंतरचा आनंदोत्सव साजरा होत असतानाच संतोष देशमुखी यांच्या आईने विचारलेल्या एका प्रश्नाने नवनियुक्त सरपंचांसह उपस्थित सर्वच हेलावून गेले.
स्वरूपानंद यांनी विजयानंतर गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली. त्यानंतर स्वरूपानंद देशमुख जेव्हा दिवंगत संतोष देशमुख यांच्या घरी आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले, तेव्हा तिथे वेगळेच चित्र पाहायला मिळाले. संतोष यांची आई यावेळी प्रचंड भावूक झाली होती. "दुसऱ्या कोणाचं असं झालं असतं तर गुलाल उधळला असता का? तुझी बहीण होती ना ती..." असा उद्विग्न सवाल त्यांनी स्वरूपानंद यांना विचारला. पराभूत उमेदवार अश्विनी देशमुख या संतोष यांच्या पत्नी आणि स्वरूपानंद यांच्या नातेवाईक असल्याने हा प्रश्न उपस्थित झाला.
या भावनिक प्रसंगी स्वरूपानंद देशमुख यांनी संयम राखत उत्तर दिले. "काही गोष्टींना इलाज नसतो, पण मी शेवटपर्यंत तुमच्या कुटुंबासोबत आहे," असे सांगत त्यांनी आईची समजूत काढली. त्यांनी संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी धनंजय देशमुख यांनीही स्वरूपानंद यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राजकीय विजय मिळाला असला, तरी संतोष देशमुख यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन स्वरूपानंद यांनी दिले.
संतोष देशमुख यांनी गावासाठी जी स्वप्ने पाहिली होती, ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही स्वरूपानंद यांनी यावेळी दिली. निवडणुकीचा रणसंग्राम संपल्यानंतर आता गावात एकोप्याचे वातावरण निर्माण करण्यावर त्यांचा भर असल्याचे दिसून आले. या भावनिक भेटीमुळे मसाजोगमधील राजकीय संघर्षाची धार कमी होऊन पुन्हा एकदा सामाजिक सलोख्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र संतोष देशमुख यांच्या आईने ज्या भावना व्यक्त केल्या त्याची चर्चा गावात चांगलीच रंगली होती.
अश्विनी देशमुखांच्या पराभवाची कारणं काय ?
- * संतोष देशमुख हत्याकांडानंतर गावातील अनेक विकास कामांना ब्रेक लागले होते.
- * सततच्या आंदोलनामुळे गावातील व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान
- * संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय देशमुख यांना आर्थिक रसद मिळाल्याची ग्रामस्थांची कुणकुण..
- * संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख, आणि धनंजय देशमुख यांच्या पत्नी प्रचारात फिरकल्या नाहीत..
- * प्रचारादरम्यान संतोष देशमुख यांच्या लहान मुलांला प्रचारात फिरवल्याने ग्रामस्थांकडून नाराजी
- * संतोष देशमुख हत्या प्रकरणातील न्यायिक लढाई लढाईची सोडून देशमुख कुटुंब राजकारणात उतरल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी.
- * मतदान केंद्रासमोरच दिवंगत संतोष देशमुख यांचे बॅनर लावल्याने मतदार संभ्रमात