मेहबूब जमादार, प्रतिनिधी
Raigad Guardian Minister Dispute : राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवून महायुती सरकार सत्तेत आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष असल्यानं पालकमंत्रिपदासाठी चांगलीच रस्सीखेच होती.
फडणवीस सरकारनं पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केल्यानंतर घटक पक्षांमधील नाराजी उघड झाली. विशेषत: रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा वाद चांगलाच चिघळला होता. या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली. पण, शिवसेनेचे भरत गोगावले देखील पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहेत.
( नक्की वाचा : राज आणि उद्धव ठाकरेंची जवळीक, मविआचे अस्तित्व धोक्यात? )
रत गोगावले यांच्या समर्थकांनी रास्ता रोको केला होता. काही ठिकाणी जाळपोळ ही झाली होती. आदिती तटकरे यांना विरोध करण्यात आला होता. वाढता विरोध लक्षात घेता रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती. आता 15 ऑगस्ट जवळ येत आहे. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री म्हणून झेंडावंदन कोण करणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
त्याचवेळी रायगडच्या पालकमंत्रिपदाचे दावेदार भरत गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. झेंडावंदनसाठी 15 ऑगस्टपर्यंत पालकमंत्रिपदाबाबत निर्णय झाला तर ठीक आहे, नाही झाला तर जे काही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे, असं गोगावले यांनी स्पष्ट केलं आहे. गोगावले यांच्या वक्तव्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद लवकरच सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.