जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला (Pahlgam Terriorst Attack) आता एक महिना उलटला आहे. 22 एप्रिल रोजी पाकिस्तानचं पाठबळ असलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांना लक्ष्य केले. यामध्ये 26 जण ठार झाले. भारतानं या हल्ल्यानंतर 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor ) राबवलं. त्यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कायम आहे. त्याचवेळी भाजपाच्या खासदारांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी हे वक्तव्य पहलगाम हल्ल्यातील पीडित महिलांबद्दल केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात भाजप खासदार रामचंद्र जांगडा (BJP MP Ramchandra Jangra) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हरियाणातील राज्यसभा खासदार जांगडा यांनी म्हटले आहे की, पहलगाम हल्ल्यात महिलांनी दहशतवाद्यांशी मुकाबला करायला हवा होता. त्या हात जोडण्याऐवजी प्रतिकार त्यांनी केला असता तर कमी लोकांचा जीव गेला असता. शनिवारी भिवानी येथे पोहोचलेल्या जांगडा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात बोलताना महिलांनी अहिल्याबाई आणि झाशीची राणी बनून सामना करायला पाहिजे होता असे म्हटले.
खासदार रामचंद्र जांगडा यांनी पहलगाम हल्ल्यातील आरोपींच्या ओळख आणि अटकेसंदर्भातील प्रश्नांना उत्तर देणे टाळले. ते म्हणाले की, आरोपी पकडले गेले नसले तरी आपल्या सैन्याने त्यांच्या ठिकाणांना आणि म्होरक्यांना नेस्तनाबूत केले आहे. पहलगाममध्ये उपस्थित असलेल्या महिला पर्यटक जर झाशीची राणी आणि अहिल्याबाई बनून दहशतवाद्यांशी भिडल्या असत्या तर कमी लोक मेले असते, कारण दहशतवादी हात जोडल्याने ऐकत नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : PM Modi on Pakistan : 'मोदीचं डोकं थंड, पण रक्त गरम'! पंतप्रधानांनी पुन्हा दिला पाकिस्तानला इशारा )
राहुल गांधींवर निशाणा
यावेळी रामचंद्र जांगडा यांनी राहुल गांधींवरही शाब्दिक हल्ला चढवला. जांगडा म्हणाले की, राहुल गांधी परदेशात जाऊन आपल्या देशाबद्दल चुकीचे बोलतात. त्यामुळे राहुल गांधींना कोणीही गांभीर्याने घेत नाही आणि त्यांना गांभीर्याने घेतलेही जाऊ नये.
शशी थरूर यांचे कौतुक
याउलट, त्यांनी काँग्रेस नेते शशी थरूर यांची प्रशंसा केली. शशी थरूर बुद्धिवादी असून, ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळात सहभागी होऊन वेगवेगळ्या देशांमध्ये पाकिस्तानचे खरे रूप उघड करत आहेत, असे जांगडा यांनी सांगितले.