- ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाने जोरदार तयारी केली आहे
- भाजपने ठाणे-पालघर जिल्ह्यात आपली ताकद वाढवून ठाणे विधानपरिषदेसाठी रणनिती आखली आहे
- भाजपने बहुजन विकास आघाडीच्या माजी महापौर राजीव पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देण्याचा विचार सुरू केला
मनोज सातवी
विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र या जागेवर भाजपचाही डोळा आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यात भाजपने ही आपली ताकद वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याची जागा भाजपने लढवावी असा मतप्रवाह पक्षात आहे. एकीकडे शिवसेना नेत्यांच्या गाठीभेटी सुरू असताना भाजपने ही आता शिवसेनेला धक्का देण्याची रणनिती आखली आहे. पडद्यामागे अनेक गोष्टी घडत आहेत. शिवसेनेकडून रविद्र फाटक तयारी करत आहेत. अशा वेळी भाजपने ही आपला पत्ता ओपन केला आहे.
भाजपने बहुजन विकास आघाडीच्या माजी महापौरांसोबत खलबते सुरू केली आहे. भाजपचे पालघरचे खासदार हेमंत सवरा,आमदार राजन नाईक, विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी या पार्श्वभूमीवर बविआचे नेते आणि माजी महापौर राजीव पाटील यांची भेट घेतली. ठाणे विधान परिषदेसाठी राजीव पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. पाटील यांच्या मागे उभे राहण्याची निर्णय भाजपकडून होवू शकतो अशी ही चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून रविंद्र फाटक, तर बविआकडून क्षितिज ठाकूर यांच्या नावाची चर्चा आहे. ठाकूर यांना शिवसेनाही पाठिंबा देवू शकते. अशा स्थितीत तिसरा उमेदवार निवडणूक रिंगणात येणार का याची चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेना क्षितिज ठाकूर यांच्या नावाचा विचार करत असताना, आता भाजप राजीव पाटील यांच्या पाठिशी उभी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजीव पाटील हे मागील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. पण त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. तेव्हा पासून राजीव पाटील हे बहुजन विकास आघाडीत नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यात आता भाजपच्या नव्या खेळीमुळे ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. ठाण्यात शिंदेंची कोंडी करण्याची भाजपने रणनिती आखली आहे का अशी चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे. भाजपच्या कोणत्या बड्या नेत्यांने याबाबत अजून स्पष्ट भूमीका मांडलेली नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. महायुतीमध्ये अजून जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दिल्लीवारी ही केली आहे. पण जागा वाटपाबाबत अजूनही तोडगा निघालेला नाही. शिवसेनेला पाच ते सहा जागा हव्या आहेत. पण त्या देण्याच्या तयारीत भाजप नाही. अशा स्थितीत जागा वाटपाची चर्चा पुढे सरकलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी मात्र चर्चा सकारात्मक झाली असल्याचं सांगितलं आहे. लवकरच जागा वाटप जाहीर होईल असं ही त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीला ही चार-पाच जागा हव्या आहेत. त्यामुळे पेच फसलेला आहे.