Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभेच्या सर्व 70 जगांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या मतदानाला आता फक्त पाच दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे देशाच्या राजधानीत प्रचार शिगेला आहे. दिल्लीत सत्तारुढ आम आदमी पार्टी (AAP) आणि भारतीय जनता पार्टी (AAP) यांच्यात प्रमुख लढत आहे. तसंच काही मतदारसंघात काँग्रेसचेही तुल्यबळ उमेदवार रिंगणात आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीला पाच दिवस शिल्लक असतानाच सत्तारुढ आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 'आप' च्या सात आमदारांनी एकाच दिवशी पक्ष सोडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कुणी सोडला पक्ष?
राजीनामा देणाऱ्या आमदारांमध्ये जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी, कस्तूरबागरचे मदन लाल, महरौलीचे नरेश यादव, त्रिकोलपूरीचे रोहित कुमार, पालमच्या भावना गौड, बिजवासनचे भुपेंद्र सिंह जून आणि आदर्श नगरचे आमदार पवन शर्मा यांचा समावेश आहे. या सर्व आमदारांचे तिकीट कापण्यात आले होते. निवडणुकीच्या तोडांवर या आमदारांनी राजीनामा दिल्यानं आम आदमी पक्षाच्या ऐक्याला तडा गेला आहे.
या सर्व आमदारांनी राजीनामा देताना आम आदमी पक्षाची कार्यपद्धती तसंच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्रिलोकपुरीचे आमदार रोहित कुमार मेहरोलिया यांनी एक्सवर त्यांचा राजीनामा पोस्ट केला आहे. 'ज्यांना बाबासाहेबांचा फक्त फोटो हवा आहे, त्यांचा विचार नको ! अशा संधीसाधू आणि बनावट लोकांशी आजपासून माझं नातं समाप्त. मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे,' अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
( नक्की वाचा : Poor Lady राष्ट्रपती मुर्मूंच्या अभिभाषावर काय म्हणाल्या सोनिया गांधी? पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी )
महरौलीचे आमदार नरेश यादव यांनी आम आदमी पक्ष भ्रष्टाचारानं बरबटलेला असल्याचं सांगत राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्षाचा उदय भ्रष्टाचाराच्या विरोधात करण्यात आलेल्या अन्ना आंदोलनात झाला होता. पण, आज आम आदमी पार्टी भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतला असल्याचं पाहून मला खूप दु:ख होत आहे, असं यादव यांनी स्पष्ट केलं आहे.