- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खासगी विमानात मुंबईहून दिल्ली प्रवासादरम्यान तांत्रिक बिघाड झाला होता
- विमानातील तांत्रिक अडचणींमुळे सुनेत्रा पवार यांचा दिल्ली प्रवासाला सुमारे 2 तास उशीरा झाला
- विमान प्रवासात पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल असल्याचीही सूत्रांची माहिती
- सागर कुलकर्णी, प्रतिनिधी
Sunetra Pawar Plane News: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खासगी विमानात ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 9 जून रोजी मुंबईहून दिल्लीला 'एनडीए'च्या (NDA) एका महत्त्वाच्या बैठकीसाठी जात असताना हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. विमानातील या बिघाडामुळे सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली प्रवासाला सुमारे दोन तास उशीर झाला.
विमानात पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही होते
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता या विमानाचे मुंबईहून दिल्लीसाठी उड्डाण होणार होते. पण ऐनवेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले. सुरक्षा आणि खबरदारीचा उपाय म्हणून विमानाचे उड्डाण तत्काळ रोखण्यात आले. त्यानंतर दोन तासांच्या उशीराने म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता विमानाने दिल्लीसाठी उड्डाण केले.
(नक्की वाचा : Pune News: खडकवासला प्रकल्पात मुबलक साठा असूनही पुणेकर तहानलेलेच राहणार? टँकर लॉबीला श्रीमंत करण्याचा डाव?)
या विमानामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबतच पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल पटेल हे दिग्गज नेतेही प्रवास करत होते. हे सर्व नेते दिल्लीत आयोजित एनडीएच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी एकत्र निघाले होते. या प्रवासाबाबत स्वतः सुनेत्रा पवार यांनीही दावा केला आहे.
(नक्की वाचा : डोंबिवलीत पिंपळेश्वर मंदिराच्या जागेवरून नवी ठिणगी? उदय सामंत यांच्या कानात सांगणारा 'तो' भाजपा नेता कोण?)
हवाई प्रवासाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
या घटनेमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा व्हीआयपी (VIP) नेत्यांच्या हवाई प्रवासाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे व्हीएसआर कंपनीच्या विमान अपघातात निधन झाले होते. त्या भीषण अपघातानंतर खासगी विमानांच्या सुरक्षा आणि देखभालीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले गेले होते. अशा पार्श्वभूमीवर आता थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवासाच्या वेळीही खासगी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची बाब समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.