- अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेला शरद पवार गटाकडून जोर दिला जात आहे
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत मृत्यूपूर्वी जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती दिली आहे
- फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण भाजपशी चर्चा न करता होणार नाही असा मुद्दा उपस्थित केला आहे
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेला जोर चढला आहे. अजित पवारांनी विलिनीकरणासाठी पुढाकार घेतला होता असं शरद पवार गटा तर्फे सांगितलं जात आहे. त्यासाठी बैठका झाल्याचं ही बोललं जात आहे. येत्या 12 फेब्रुवारीला त्याची घोषणा केली जाणार होती असा दावा ही शरद पवार गटाकडून केला जात आहे. या चर्चेत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही उडी घेतली आहे. त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले मृत्यू आधी अजित पवार आणि आपल्यात जवळपास 1 तास चर्चा झाल्याची माहिती दिली आहे . शिवाय विलिनीकरणाच्या चर्चांवरही त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. अजित पवार एकत्रिकरणाची चर्चा करत होते. तर ते कुठली ही चर्चा भाजपशी केल्या शिवाय करतील का असा प्रश्नही फडणवीसांनी केला. विलिनीकरण करावे की नाही हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. पण ते करण्या आधी ते नक्कीच भाजप सोबत चर्चा करतील. आधी ही केली आहे आणि पुढे ही करतील असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
शिवाय जर अजित पवार विलिनीकरणाची चर्चा करत होते तर मग ती सत्तेतून बाहेर पडण्यासाठी करत होते का? ते तर एनडीएत होते. आमच्या सोबत सत्तेत होते. सरकार स्थिर होते. अशा स्थितीत ते चर्चा का करतील असा प्रश्नही फडणवीसांनी केला. याबाबत काही जण रोज कन्फ्यूजन निर्माण करत आहेत. ही पद्धत योग्य नाही असं ही ते म्हणाले. आम्हाला राजकारण करायचं नाही. अजित पवारांसोबत आधी काय घडलंय, त्यांच्या सोबत काय झालंय हे मला माहित आहे. मला बोलायला लावू नका असं ही फडणवीस यावेळी म्हणाले.
अजित पवारांचे आणि आपले संबंध अतिशय चांगले होते. ते मला काही झाले तरी सर्व सांगायचे. त्यांनी कोणती ही गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली नाही. अजित पवारांचा मृत्यू झाला त्या आधी एक तास आम्ही गप्पा मारत होतो. तसं काही असतं तर त्यांनी आपल्याला सांगितलं असतं. पण त्यांनी याबाबत काही ही सांगितलं नाही. त्यामुळे आता खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही. राष्ट्रवादीचे दोन वेगवेगळे पक्ष झाले आहेत. अजित पवारांच्या पक्षाचे नेतृत्व सुनेत्रा पवार करत आहेत. त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्व आहोत असंही फडणवीस म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने त्यांनी शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चेला फेटाळून लावले आहे.