- तामिळनाडूत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे
- तामिळनाडू प्रदेशाध्यक्षपदावरून अन्नामलाई यांना हटवण्यात आले होते
- अन्नामलाई नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार करत आहेत
भारतीय जनता पक्ष सध्या केंद्रात आणि देशातल्या अनेक राज्यात सत्तेत आहे. असं असताना भाजपला दक्षिण भारतात खास करून केरळ आणि तामिळनाडूत जम बसलता आला नाही. त्यात तामिळनाडूमध्ये अन्नामलाई यांच्या नेतृत्वात पक्ष वाढवण्याचं काम होत होतं. मात्र त्याच वेळी अन्नामलाई यांना प्रदेशाध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आलं. तेव्हा पासून ते नाराज होते. त्यामुळे अन्नामलाई हे लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्नामलाई भाजपमध्ये आपले राजकीय भविष्य अंधारात पाहत असून, ते लवकरच स्वतःचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करू शकतात.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासोबत दिल्लीत होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वीच या घडामोडी समोर आल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळबळ उडाली आहे. चेन्नई विमानतळावर पत्रकारांनी त्यांना याविषयी विचारले असता, "कृपया थोडी वाट पाहा, 2 दिवसांत सविस्तर बोलू," असे अन्नामलाई यांनी सांगितले होते. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या 1 महिन्यातच या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. 234 जागांच्या तामिळनाडू विधानसभेत भाजपला केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागले. या पराभवानंतर अन्नामलाई यांना पक्षात बाजूला पाडण्यात आल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे.
दिल्लीला जात असताना यांच्या गाडीवर भाजपचा झेंडा नव्हता. ज्यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले. पक्षाने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्यसभेची ऑफर दिली होती, मात्र अन्नामलाई यांनी ती फेटाळल्याचे समजते. थेट राजकीय पक्ष स्थापन करण्याऐवजी अन्नामलाई आधी एक मोठे जनआंदोलन उभे करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून समविचारी लोक आणि तरुणांचे एक मोठे नेटवर्क तयार केले जाईल. काही दिवसांपूर्वीच त्यांनी केंद्र सरकारच्या सीबीएसईच्या त्रि-भाषा धोरणावर उघड टीका केली होती. 2029-30 मध्ये लागू होणारे धोरण आताच का लादले जात आहे, असा सवाल त्यांनी केला होता, ज्यामुळे त्यांचे पक्षासोबतचे मतभेद उघड झाले होते.
अन्नामलाई यांच्या रूपात तामिळनाडूत भाजपला आक्रमक चेहरा मिळाला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र लढण्याचा आग्रह धरला असताना, दिल्लीतील हायकमांडने एआयएडीएमके (AIADMK) सोबत युती केली. एआयएडीएमकेचे सरचिटणीस पलानीस्वामी यांनी युतीसाठी अन्नामलाई यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची अट ठेवली होती. जी दिल्लीने मान्य केली. या अपमानामुळेच अन्नामलाई यांनी 2026 ची विधानसभा निवडणूक लढवली नाही. ते प्रचारापासूनही दूर राहिले. आता ते नवीन सुरूवात करण्याच्या तयारीत आहेत.