- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत
- प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मदत केली होती
- ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात असून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित आहे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. पक्षाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं समजत आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं जवळपास निश्चित केलं आहे. नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवेळी त्यांनी माघार घेतली होती. ही निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. मात्र भाजपच्या जेष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढली. शिवाय काही आश्वासन ही दिलं. तेव्हापासून ते भाजपच्या वाट्यावर असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. शिवाय अहिल्यानगरमध्ये त्यांची मोठी ताकद आहे. तनपुरे हे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे ही आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाहीत असं बोललं जात होतं. पण गेल्या काही दिवसांपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात होते. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. तसे झाल्यास तो शरद पवारांसाठी मोठा धक्का असेल. शरद पवारांनी तरुण नेत्यांची फळी तयार केली होती. त्या नेत्यां पैकीच एक प्राजक्त तनपुरे होते. त्यांना पवारांनीच संधी दिली होती. मविआच्या सरकारमध्ये ते मंत्री होतं.
प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्यानंतर त्यांनी स्वतःचे फेसबुक प्रोफाईल बदलले आहे. त्यांनी आपल्या डीपीमध्ये जयंत पाटलांचा फोटो लावला आहे. त्यामुळे एक प्रकारचा हा भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित होणार असून आज किंवा उद्या ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे अहिल्यानगरमध्ये भाजपची ताकद निश्चितच वाढणार आहे. तर राष्ट्रवादीची शक्ती मात्र या निमित्ताने घटणार आहे.
प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे अहिल्यानगरचे राजकारण ही बदलणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामधून विधान परिषदेचे सदस्य निवडायचे आहे. अहिल्यानगरचा ही त्यात समावेश आहे. त्यामुळे या जागेसाठी भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांचा विचार होवू शकतो. विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपला सहकार्य केले होते. त्याचे बक्षिस तनपुरेंना दिले जावू शकते. अनेक वर्षापासून ते राष्ट्रवादीचे काम करत आहेत. मागे त्यांनी पक्षासोबत प्रामाणिक राहीलो. पण त्यामुळे राजकारणचं संपत चाललं आहे अशी खंत व्यक्त केली होती. त्याच वेळी ते पक्षा बदलतील असं बोललं जात होतं.