मोठी बातमी : निलेश राणे लवकरच शिवसेनेत परतणार? 19 वर्षांनंतर होणार घरवापसी!

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी एकेकाळी ओळख असलेल्या नारायण राणे यांनी 2005 साली शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. नारायण राणेंसोबत त्यांचे दोन्ही मुलं देखील शिवसेनेपासून दुरावली. गेल्या 19 वर्षात परिस्थिती बरीच बदलली आहे. नारायण राणे आणि त्यांची मुलं आता भाजपमध्ये आहेत. तर शिवसेनेचे दोन भाग झाले आहेत. आता तब्बल 19 वर्षांनी नारायण राणेंचे चिरंजीवर निलेश राणे शिवसेनेत परतण्याची शक्यता आहे. NDTV मराठीला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी निलेश राणे आग्रही आहेत. मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीत यावर चर्चा झाली. निलेश राणे शिवसेनेकडून कुडाळ-मालवणचे उमेदवार असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

कुडाळमध्ये शिवसेनेचे वैभव नाईक सध्या आमदार आहेत.  शिवसेनेत फुट पडल्यानंतर वैभव नाईक यांनी ठाकरेंची साथ दिली. त्यामुळे या मतदार संघावर महायुतीत शिवसेना शिंदे गटाचा दावा आहे. मात्र हा मतदार संघ भाजपला सुटावा असे राणे यांचे प्रयत्न आहेत. या मतदार संघातून राणेंचे पुत्र निलेश राणे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी या मतदार संघात तयारीही सुरू केली आहे. 

( नक्की वाचा : 'बाळासाहेब थोरातांची भाजपासोबत सेटलमेंट' भाजपा नेत्याचाच गौप्यस्फोट )

भाजपाला ही जागा मिळणे अवघड असल्यानं तोडगा म्हणून निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाईर यांनी नारायण राणे यांचा पराभव केला होता. त्यानंतर राणे कुटुंबीयांकडून कुणीही या मतदारसंघात निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे यंदा 10 वर्षांनी पुन्हा एकदा कुडाळमधून राणे विरुद्ध नाईक या पारंपारिक प्रतिस्पर्धींमध्ये लढत होऊ शकते. 

निलेश राणे यांचा राजकीय प्रवास

निलेश राणे हे नारायण राणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. ते 2009 साली सर्वप्रथम काँग्रेसच्या तिकीटावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर 2014 मधील लोकसभा निवडणुकीत त्यांचा शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी पराभव केला. राणे यांनी 2019 मधील लोकसभा निवडणूक त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाकडून लढवली होती. त्या निवडणुकीतही ते विनायक राऊत यांच्याकडून पराभूत झाले.

विनायक राऊत यांचा हल्लाबोल

दरम्यान निलेश राणे यांना भाजपालनं हाकलून दिलंय, हे आता स्पष्ट झालं आहे. कुडाळमध्ये वैभव नाईक त्यांना पराभूत करतील अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राणेंचे कट्टर विरोधक विनायक राऊत यांनी केली आहे. 

Topics mentioned in this article