हिंदी सक्तीचा डाव उधळला गेला आहे. मराठी माणूस एकवटला म्हणून सरकार नमलं. मराठी माणसा समोर सरकारची शक्ती कमी पडली अशी प्रतिक्रीया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. हिंदी सक्तीचा जीआर रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. मराठी अमराठी वाद लावण्याचा सरकारचा डाव होता, असा आरोप उद्धव यांनी केला. दरम्यान आता 5 जुलैला मोर्चा नाही तर विजयी सभा होणार अशी घोषणा ही उद्धव यांनी यावेळी केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्रिभाषा सुत्रासाठी समिती नेमली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. सक्ती होवू देणार नाही, असं ही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे या विजयाचा जल्लोष 5 जुलैला केला जाईल. याच दिवशी हिंदी सक्ती विरोधात मोर्चा निघणार होता. या मोर्चा ठाकरे बंधू एकत्र येणार होते. आता हा निर्णय रद्द झाल्यामुळे आपण विजयी सभा घेवू असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. शिवाय त्याचे स्वरूप कसे असेल याचा निर्णय पुढील दोन दिवसांत सर्वां बरोबर चर्चा करून घेवू असं ही त्यांनी सांगितलं.
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. शिवाय उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाच हा निर्णय स्विकारला गेला होता असं फडणवीसांनी सांगितलं. फडणवीसांचे हे सर्व आरोप उद्धव यांनी खोडून काढले आहेत. विरोधकांची बदनामी करण्याचा भाजपचा डाव आहे. भाजप खोट्याची फॅक्टरी आहे. अफवांची फॅक्टरी आणि त्यावर फडणवीसांचा फोटो लावावा लागेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांना मराठी कळतं का असा प्रश्न ही त्यांनी या निमित्ताने केला.
त्यावेळी नक्की काय झालं होतं हे उद्धव ठाकरे यांनी सांगित फडणवीसांचे आरोप खोडून काढले आहे. त्यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं होतं.. त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्या काळात समिती नेमली होती. त्यांनी एक अहवाल सादर केला होता. त्यावर पुन्हा चर्चा करण्यासाठी अभ्यासगट नेमला होता. त्याची एकही बैठक झाली नाही. तो अहवाल आपल्या समोर काधीच आला नाही. मला त्याबाबत काही माहिती नाही. आपल्या सरकारने त्याबाबतचा कोणताही जीआर काढला नव्हता. तो जीआर फडणवीसांनीच काढला असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे फडणवीस हे खोट बोलत आहेत असं ही त्यांनी सांगितलं.
मराठी माणूस एकत्र येवू नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. मोठ्या संख्येने मराठी माणूस या मोर्चाच्या माध्यमातून एकवटणार होता. त्यामुळे त्याला एकत्र येवू द्यायचे नाही यासाठी हा जीआर रद्द केला गेला आहे असंही ते म्हणाले. पण मराठी माणसाने सरकारला झुकवले आहे. मराठी माणसात फूट पाडण्याचा सरकारचा डाव उधळण्यात मराठी माणसाला यश आल्याचं ही ते म्हणाले.